नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाचे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 1 हजार 334 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
देशातली एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 हजार 712 झाला आहे, यात 12 हजार 974 अॅक्टिव्ह केसेस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 2 हजार 230 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 507 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 3 हजार 651 कोरोनाबाधित असून 211 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 हजार 372 कोरोनाबाधित असून 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 1 हजार 893 कोरोनाबाधित तर 42 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ राजस्थानमध्येही 1हजार 351 कोरोनाबाधित आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
कशी संपते कोरोना संक्रमण साखळी -
एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसांत एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते.