नवी दिल्ली- आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देशम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांना मोठ्ठा दणका बसला आहे. त्यांच्या पक्षाच्या चार राज्यसभा सदस्यांनी पक्षाला राजीनामा देत टीडीपी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. टीडीपीचे राज्यसभा सदस्य सीएम रमेश, टीजी व्यंकटेश, जी मोहन राव आणि वाईएस चौधरी हे टीडीपीची साथ सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत. आपण तेलगू देसममधून राजीनामा देत असल्याचे पत्र त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना दिले आहे.
ममतांनंतर भाजपचा चंद्राबाबूंना धक्का; चार राज्यसभा सदस्यांनी सोडला पक्ष - एन चंद्राबाबू नायडू
भाजपने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर तेलगू देसम पक्षाला धक्का दिला आहे.
![ममतांनंतर भाजपचा चंद्राबाबूंना धक्का; चार राज्यसभा सदस्यांनी सोडला पक्ष](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3615231-thumbnail-3x2-2.jpg)
राज्यसभेमध्ये टीडीपीचे एकूण 6 सदस्य असून यापैकी 4 जणांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज वाईएस चौधरी, सीएम रमेश, टीडी व्यंकटेश यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तर जीएम राव हे काही कारणास्तव नंतर भाजपमध्ये सामील होणार आहेत. दरम्यान, भाजपने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर तेलगू देसम पक्षाला धक्का दिला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत तेलगू देसम पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाला लोकसभेच्या 25 पैकी 3 जागांवरच विजय मिळाला होता. तर विधानसभेच्या 175 जागांपैकी केवळ 23 जागांवर टीडीपीला समाधान मानावे लागले होते.