महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ईव्हीएम चोरी प्रकरणातील आरोपीची टीडीपीकडून पाठराखण, निवडणूक आयोगावरच ताशेरे

मुख्यमंत्री नायडू आणि टीडीपीने निवडणूक आयोगावरच मुख्य मुद्दा टाळत असल्याचा आरोप केला आहे. आयोग इतर मुद्द्यांची चर्चा करत आहे, मात्र, ईव्हीएम खराब असल्याच्या मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा उलट आरोप केला आहे.

By

Published : Apr 14, 2019, 3:58 PM IST

चंद्राबाबू नायडू

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने तेलुगु देशम पार्टीला (टीडीपी) पत्र लिहून 'पक्षप्रमुख एन. चंद्राबाबूंचे प्रतिनिधिमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटायला आले असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला यात का सहभागी करण्यात आले,' याचे उत्तर मागवले आहे. या व्यक्तीचे नाव हरी प्रसाद वेमुरु असे आहे. ही व्यक्ती ईव्हीएम मशिनमध्ये कथित घोटाळ्यात गुन्हेगारी प्रकरणात सहभागी होती.

दरम्यान, मुख्यमंत्री नायडू आणि टीडीपीने निवडणूक आयोगावरच मुख्य मुद्दा टाळत असल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाला पत्राचे उत्तर देताना नायडू यांनी आयोगावरच ताशेरा ओढला आहे. निवडणूक आयोग इतर मुद्द्यांची चर्चा करत आहे, मात्र, ईव्हीएम खराब असल्याच्या मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा उलट आरोप केला आहे. नायडू यांनी राज्यातील ३० ते ४० टक्के ईव्हीएम मशीन्स व्यवस्थित चालत नसल्याचा आरोप केला होता. त्यांनी जवळपास १५० मतदान केंद्रांवरील निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी केली होती.

हरी प्रसाद या व्यक्तीविषयी २०१० मध्ये प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती. नायडू निवडणूक आयुक्तांना भेटण्यास आल्यानंतर सोबत हरी प्रसाद वेमुरू ही व्यक्तीही होती. या व्यक्तीने निवडणूक आयुक्तांसमोर ईव्हीएम मशीनविषयी विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. तसेच, आपण यातील तज्ज्ञ असल्याचा दावाही केला. तेव्हा निवडणूक आयोगाची तांत्रिक टीम या व्यक्तीला याविषयी विस्तारपूर्वक माहिती देईल, असे ठरले. नंतर हरी प्रसाद २०१० मध्ये ईव्हीएमशी संबंधित घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचे समोर आले, अशा तथाकथित तज्ज्ञाला चंद्राबाबूंच्या प्रतिनिधिमंडळात का सहभागी करण्यात आले, असे आयोकाने विचारले आहे.

शनिवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नायडू यांनी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले होते. यामध्ये गुरुवारी राज्यात मतदानादरम्यान मोठ्या संख्येने ईव्हीएम मशीन्स खराब असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच, सुरक्षेअभावी हिंसक घटनाही घडल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details