कोलकाता - उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात तब्बल ३ हजार टन सोनं सापडल्याचे वृत्त काल (शनिवार) सर्वत्र पसरले होते. नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनापहाडी आणि हरदी या दोन जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत, असे सांगण्यात येत होते. मात्र, भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) याबाबतची माहिती फेटाळून लावली आहे. सोनभद्र जिल्ह्यात सुमारे १६० किलो सोने मिळाले असून तीन हजार टन सोने मिळण्याची कोणतीच माहिती नसल्याचे जीएसआयने म्हटले आहे.
सोनभद्रमध्ये ३ हजार टन नव्हे, फक्त १६० किलो सोने; जीएसआयचा खुलासा - फक्त १६० किलो सोने
सोनभद्र जिल्ह्यात सुमारे १६० किलो सोने मिळाले असून तीन हजार टन सोने मिळण्याची कोणतीच माहिती नसल्याचे जीएसआयने म्हटले आहे. नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनापहाडी आणि हरदी या दोन जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत, असे सांगण्यात येत होते.
जिल्हा उत्खनन अधिकारी के.के. राय यांनी काल ३३५० टन सोने सापडल्याचा दावा केला होता. याबाबत जीएसआयचे महासंचालक एम.श्रीधर यांनी कोलकाता येथून माहिती दिली. यासंबंधीची माहिती किंवा डेटा जीएसआयकडून कोणालाही दिला जात नाही, असे माहिती त्यांनी दिली.
जीएसआयने सोनभद्र जिल्ह्यात सोने असल्याचा कोणताही अंदाज वर्तविला नव्हता, असे एम.श्रीधर यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्य युनिटसोबत सर्व्हे केल्यानंतर आम्ही कोणत्याही सापडलेल्या धातूची माहिती देतो. आम्ही (जीएसआय, उत्तर विभाग) या भागात १९९८-९९ आणि १९९९-२००० मध्ये उत्खनन केले होते. त्यासंबंधीचा अहवाल उत्तर प्रदेशच्या डीजीएमकडे सोपविला होता.