मुंबई- आजकाल समाज माध्यमे अर्थात् सोशल मीडिया हे लोकांसाठी संवाद साधण्याचे महत्त्वाचे साधन बनले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअॅपस आणि इतर अनेक नेटवर्किंग, फोटो शेअरिंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळे आणि अॅप्लिकेशन्स आपल्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाली आहेत.
या संकेतस्थळांवरून आपण अनेक प्रेक्षकांसाठी जलद गतीने ग्राफिक्स, फोटो, संदेश निर्माण करणे, व्यवस्थापन करणे आणि शेअर करण्याची संधी उपलब्ध करुन देतात. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, सोशल मीडियावरून माहितीची निर्मिती आणि शेअरिंगबरोबरच ऑनलाईन जग विस्तारण्याची, लोकांमधील संवाद वाढविण्याची तसेच समवयस्कांना मानसिक आधार देण्याची संधी मिळते. सध्या सुरू असलेल्या कोविड-19 सारख्या सार्वजनिक आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीत, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचे साधन ठरू शकते. सोशल मीडिया वापरण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे.
सोशल मीडियावर सकारात्मक, प्रमाणित माहितीचा प्रसार शक्य आहे, त्याचप्रमाणे अफवा आणि चुकीची माहिती पसरविणेदेखील सहजपणे शक्य आहे. यामुळे, सोशल मीडियाच्या माध्यमातून नवी माहिती निर्माण करणे, त्याचप्रमाणे आपल्यापर्यंत पोहोचणारी माहिती शेअर किंवा लाईक करताना आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. गेल्या काही आठवड्यांत आलेल्या चढ-उतारांमुळे सोशल मीडियाचे दुतोंडी स्वरुप खरोखर समोर आणले आहे.
चांगल्या माहितीमध्ये अशा स्वरुपाच्या संदेश, फोटो, व्हिडिओ आणि ग्राफिक्सचा समावेश होतो ज्याचा उपयोग हात धुणे, शारिरीक अंतर राखणे किंवा स्वतःचे विलगीकरण करणे यासारखे संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभिनव पद्धतीने करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, जागतिक आरोग्य संघटना, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि काही सामाजिक संस्थांद्वारे कशाप्रकारे 20 सेकंद हात धुवावेत (हॅपी बर्थडे गाण्याचा वापर करुन) किंवा शारिरीक अंतर कसे राखावे हे लोकांना दाखवण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर प्रभावीपणे केला जात आहे.
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 22 मार्च रोजी लाखो भारतीयांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या वाजविल्या. परंतु त्यांनी ही गोष्ट इतर लाखो लोकांबरोबर सोशल मिडीयावरुन शेअर केली. घरापासून लांब असणाऱ्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना इतर भारतीयांकडून होत असलेले कौतुक आणि मिळत असलेला पाठिंबा पाहायला मिळाला. आरोग्य कर्मचारी आणि अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी अन्न आणि जीवनावश्यक वस्तू गोळा करीत (क्राउडसोर्सिंग) सामुहिक कृतीचे साधन म्हणून लोकांकडून सोशल मिडीयाचा वापर केला जात आहे.
सेलिब्रिटीज् भारतातील लॉकडाऊनचे पालन करण्याबाबतचे व्हिडिओज आणि संदेश शेअर करीत आहेत. शास्त्रज्ञ, पत्रकार आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील व्यावसायिक सरकारी धोरणे, ताज्या बातम्यांबाबत चर्चा करीत आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या सहकाऱ्यांना सामाजिक आणि भावनिक आधार देत आहेत. वृत्त वाहिन्यांनादेखील सोशल अॅप्सद्वारे आपला प्रसार वाढविण्यास मदत होते आणि नव्या प्रेक्षकांकडून अतिरिक्त मत-मतांतरे उपलब्ध होतात.
दोन जोडप्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, अशा प्रकारची बनावट बातमी पसरविणाऱ्या दोघांना वेगवेगळ्या प्रसंगी मुंबई आणि कोल्हापूर येथे अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे, सोशल मिडीयावर कोविडसंदर्भातील चुकीची माहिती पसरविणाऱ्या 29 वर्षीय महिलेला कोलकाता येथे अटक झाली. काही स्वयंघोषित गुरुंकडून गोमुत्राचे सेवन केल्याने सर्व विषाणूंपासून सुटका होईल, अशा आशयाचे व्हिडिओ प्रसिद्ध केले जात आहेत.