लखनऊ - शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ओवैसी यांनी मुघलांनी भारतावर 800 वर्षे राज्य केल्याचे वक्तव्य केले होते. यावर रिझवी यांनी मुघल बादशाह नाही लुटारू होते, असे म्हटले आहे. 'मुघलांनी मंदिरे पाडून त्यांची तोडफोड करून जामा मशिदी बांधल्या,' असेही ते म्हणाले.
'ओवैसी म्हणतात की, त्यांचे बाप-जादे मुघल आणि औरंगजेब होते. या मुघलांच्या अवलादी आपल्या बाप-जाद्यांनी हिंदुस्तानावर 800 वर्षे सत्ता गाजवल्याचे सांगताहेत. मात्र, मुघल येथील बादशाह किंवा राजे नव्हते. ते परदेशातून आलेले लुटारू होते. त्यांनी येथील लोकांना कैदी बनवून त्यांच्यावर जुलूम, अत्याचार केले,' असे रिझवी म्हणाले.
'ओवैसी म्हणतात, मुघलांनी भारताला चार मीनार, लाल किल्ला बांधून दिला. पण प्रत्यक्षात त्यांनी येथील मंदिरे पाडून त्यांची तोडफोड करून जामा मशिदी बांधल्या आहेत. ओवैसींच्या बाप-दाद्यांनी त्यांच्या प्रेयसींसाठी ताजमहाल बांधला,' असेही रिझवी पुढे म्हणाले.
'ओवैसींच्या बाप-जाद्यांनी मुघलांनी भारत आणि भारतीयांसाठी काय केले,' असा सवाल रिझवी यांनी केला.
'भारताचा इतिहास केवळ 800 वर्षे जुना नाही. हजारो वर्षे जुना आहे. ही रामाची धरती आहे, रामाचा देश आहे, रामाचा हिंदूस्तान आहे. अयोध्या, काशी, मथुरा, हरिद्वार प्रत्येक ठिकाणी आजही मशिदी दिसतात. तेथे मुस्लिमांना येण्या-जाण्यास अटकाव केलेला नाही. ही हिंदूंची उदारमतवादी विचारसरणी आहे,' असे ते म्हणाले.
'मात्र, कुठल्या हिंदूला मक्केला जाण्याची परवानगी आहे का? मक्केमध्ये कुठले मंदिर बांधले जाऊ शकते का? हा मुस्लीम कट्टरपंथियांचा खरा चेहरा आहे. यामुळे संपूर्ण जग कट्टरतावादी इस्लामी विचारसणीमुळे दहशतीखाली आहे,' असे म्हणत त्यांनी अकबरुद्दीन ओवैसींवर सडकून टीका केली.
अकबरुद्दीन ओवैसी यांनी भारतात 800 वर्षे मुघलांची सत्ता होती, असे वक्तव्य केले होते. 'अरे आठशे वर्षे मी या देशावर सत्ता गाजवली आहे. हा माझा देश आहे. माझा होता आणि माझाच राहील. आबा-ओ-अजदाद (माझ्या बाप-जाद्यांनी) या देशाला चारमीनार दिला. मक्का मशीद दिली. जामा मशीद दिली. कुतुबमीनार दिला. अरे, भारताचे पंतप्रधान (हिंदुस्तान का वजीर-ए-आजम) ज्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतात, तोही माझ्या आबा-ओ-अजदाद यांनी बांधला आहे. जर कोणी कागदावरील पुरावे मागत असेल तर, त्यांनी चारमीनार पाहावा. तो सर्वांत मोठा पुरावा आहे. तो माझ्या बाप-जाद्यांनी तयार केला आहे. तुझ्या बापाने बांधलेला नाही,' असे अकबरुद्दीन यांनी म्हटले होते.