महाराष्ट्र

maharashtra

शेहला रशीदला न्यायालयाचा दिलासा, देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी सध्या अटक नाही

By

Published : Sep 10, 2019, 1:21 PM IST

'शोपियानमध्ये ४ जणांना लष्कराच्या शिबिरात बोलावण्यात आले. त्यांना चौकशीच्या नावाखाली जबरदस्त मारहाण करण्यात आली,' असा दावा शेहलाने केला आहे. 'या लोकांजवळ माईक ठेवण्यात आले होते. संपूर्ण परिसरात त्यांच्या किंकाळ्या पोहोचाव्यात आणि लोकांना दहशत बसावी यासाठी असे करण्यात आले. या पद्धतीने या भागात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे,' असे तिने लिहिले होते.

शेहला रशीद

श्रीनगर -जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंटची नेता आणि जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्ष शेहला रशीदविरोधात गेल्या आठवड्यातच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. ट्विटरवर काश्मीरमधील परिस्थितीबाबत खोटे मेसेज पसरवण्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सोमवारी दिल्लीच्या न्यायालयाने शेहला रशीदला अटकेपासून अंतिरम संरक्षण दिले आहे. यामुळे शेहलाला दिलासा मिळाला आहे.

पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पवन कुमार जैन यांनी शेहलाला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. या प्रकरणात सविस्तर चौकशी आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती जैन यांनी म्हटले आहे. याप्रकरणी ५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. तोवर शेहलाला अटक होऊ नये, असे ते म्हणाले. त्यांनी शेहला यांना चौकशीला उपस्थित राहण्याचे आणि सहकार्य करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा - जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शेहला राशीदविरोधात एफआयआर

शेहला हिने सैन्य दलांवर आगपाखड केली होती. 'लोक जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेविषयी कोणतेही अधिकार नसल्याचे म्हणत आहेत. त्यांना अधिकारशून्य करण्यात आले आहे. सर्व काही निमलष्करी दलांच्या हातात गेले आहे. सीआरपीएफमधील एकाची तक्रार केल्यानंतर पोलीस ठाण्याच्या मुख्य अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. ठाणे अधिकारी दहशतीखाली आहेत. त्यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर्सही नाहीत,' अशा आशयाची ट्विटस शेहलाने केली होती.

आणखी एका पोस्टमध्ये तिने भारतीय लष्कर रात्रीच्या वेळी लोकांच्या घरात घुसत असल्याचा आरोप केला होता. 'भारतीय लष्कर रात्रीच्या घरांमध्ये घुसून तरुणांना पकडून नेत आहे. तसेच, लूटमारही करत आहे. हेतूपुरस्सर घरातील पीठ ओतून देत आहे. तांदळामध्ये तेल मिसळत आहे,' असे या पोस्टमध्ये तिने लिहिले होते.

हेही वाचा - जम्मू-काश्मीर : शेहला राशिदचे आरोप निराधार - भारतीय लष्कर

याशिवाय, 'शोपियानमध्ये ४ जणांना लष्कराच्या शिबिरात बोलावण्यात आले. त्यांना चौकशीच्या नावाखाली जबरदस्त मारहाण करण्यात आली,' असा दावा शेहलाने केला आहे. 'या लोकांजवळ माईक ठेवण्यात आले होते. संपूर्ण परिसरात त्यांच्या किंकाळ्या पोहोचाव्यात आणि लोकांना दहशत बसावी यासाठी असे करण्यात आले. या पद्धतीने या भागात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे,' असे तिने लिहिले होते.

यानंतर 'शेहलाने ज्या पातळीवर आरोप केले आहेत, ते सर्व निराधार आणि आम्ही ते फेटाळले आहेत. समाजविघातक व्यक्ती आणि संस्थांकडून अशा प्रकारच्या सत्यता पडताळणी न केलेल्या आणि खोट्या बातम्या पसरवल्या जातात. जनतेला चिथावणी देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारची कृत्ये केली जातात,' असे भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते.

अशा प्रकारची माहिती पसरवल्याबद्दल शेहला राशीद हिच्याविरोधात देशद्रोह आणि वेगवेगळ्या समुदायांमध्ये वैमनस्य पसरवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details