धनबाद (झारखंड) -सध्या केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ शैवालापासून खाद्य पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करताहेत. शैवाल वनस्पती सहसा तलाव, जलाशय आणि नद्यांमध्ये आढळतात. ही एक हिरव्या पानांची वनस्पती असते, जिचे मुळं, देठ आणि पानं असे भाग नसतात. शैवाल वनस्पतींचे काही प्रकार हानिकारक आहेत. तर, काही अन्न, औषध आणि शेतीत वापरता येण्यासारखे आहेत.
शैवाल वनस्पतींमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेटस आणि जीवनसत्त्वे यासह बरीच पोषक तत्त्वेही असतात. धनबादच्या झारिया परिसरातल्या डिगवाडीहमध्ये असलेल्या सिम्फर येथील शास्त्रज्ञांनी शैवालापासून खाद्यपदार्थ बनवण्याचा प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
हेही वाचा -'त्या' दिवशीच्या वर्तमानपत्राची आजही मंदिरात केली जाते पूजा..!
यासाठी, शास्त्रज्ञ अशा पदार्थांना शैवाल वनस्पतींपासून वेगळे काढत आहेत, जे मानवी शरीरास हानी पोहोचवू शकतात. यानंतर त्यातून पौष्टिक घटक काढून खाद्यपदार्थ तयार केले जातील. हे पदार्थ कॅप्सूल, गोळ्या किंवा पावडरच्या स्वरूपात तयार केले जातील. जेणेकरून, ते लोकांपर्यंत सहज पोहचू शकेल.
शैवाल वनस्पतींची उत्पादने पूर्णपणे शाकाहारी असतील. यासह, त्याची किंमत इतकी कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल की, गरीब वर्गातील लोकही याचा वापर करू शकतील. शास्त्रज्ञांच्या मते, हे कुपोषणावर मात करण्यासही मदत करेल. शैवालाच्या उत्पादनासंदर्भातही शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
सध्या शैवाल चीन, जपान, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियासह बर्याच देशांमध्ये खाद्यपदार्थ म्हणून वापरले जाते. वाढत्या लोकसंख्येतील अन्नाची समस्या सोडवण्यासाठी असे प्रयोग करणं आवश्यक आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर, आपल्या रोजच्या आहारात शैवालवर्गीय वनस्पतींचा समावेश असेल. यामुळे पौष्टिकतेत वाढ होऊन अन्नाची समस्याही दूर होईल.
हेही वाचा -भाकरी विकणाऱ्या महादेवींची प्रेरणादायी कहाणी; २०० महिलांना दिलाय रोजगार