महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 20, 2020, 4:00 PM IST

ETV Bharat / bharat

मध्यप्रदेश: कमलनाथ यांच्या 'त्या' आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राहुल गांधी नाराज

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजप उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल केलेल्या असभ्य वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, कमलनाथ यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

भोपाळ - मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजप उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल केलेल्या असभ्य वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे. कमलनाथ आमच्या पक्षाचे आहेत. मात्र, त्यांनी ज्या प्रकराची भाषा वापरली ती मला आवडली नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर असून त्यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली.

राहुल गांधी म्हणाले, मी या वक्तव्याचा स्वीकार करत नाही. मग ते कोणीही असो, हे दुर्देवी आहे. अशा प्रकारच्या भाषेचा वापर करायला नको, कारण ही योग्य भाषा नाही. कमलनाथ यांनी जी भाषा वापरली ती मला वैयक्तिकरित्या आवडली नाही.

राहुल गांधी यांनी व्यक्त केली नाराजी

माफी मागणार नाही - कमलनाथ

राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कमलनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींनी जे वक्तव्य केले आहे, ते त्यांचे वैयक्तीक मत आहे. त्यांना जे सांगितले गेले, त्यानुसार त्यांनी प्रतिक्रिया दिली. इमरती देवी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागणार नाही, असे कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

इमरती देवी या 'आयटम' कमलनाथ यांचं वक्तव्य

मध्यप्रदेशातील डबरा मतदारसंघात एका सभेदरम्यान कमलनाथ यांनी भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांना आयटम संबोधले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून भाजपने काँग्रेसला घेरले आहे. कमलनाथ यांच्या वक्तव्याचा विरोध म्हणून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन तासाचे मौन पाळले होते. तसेच त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पत्र लिहून निषेध व्यक्त केला आहे.

माजी मुख्यमंत्री कमलनाथ

मध्यप्रदेशात २८ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका आहेत. भाजपाला बहुमतासाठी आठ जागा हव्या असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेस पक्षातून बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत २० पेक्षा जास्त आमदारांनी पक्ष सोडला होता. त्यानंतर कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार कोसळले. राजकीय उलथापालथ झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सत्तेत आली. त्यामुळे आता भाजपा सरकार खाली खेचण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details