महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 4, 2019, 11:26 AM IST

ETV Bharat / bharat

राहुल गांधींच्या निर्णयाचं प्रियांकांकडून समर्थन; म्हणाल्या - असं धाडस फार कमी लोकांत असतं

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाचं प्रियंका गांधींनी समर्थन केले आहे.

प्रियंका गांधी

नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी बुधवारी चार पानी पत्र लिहीत आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे प्रियांका गांधींनी समर्थन केले आहे. राहुल गांधींसारखे धाडस फार कमी लोक दाखवतात, असे प्रियांका यांनी ट्विटर करून म्हटले आहे.


लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 'काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मी या संधीबद्दल ऋणी आहे आणि माझे या संघटनेवर नितांत प्रेम आहे. मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. जे घडले ते पक्षाच्या वाढीसाठी चिंताजनक आहे. या कारणाने मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे,' अशा स्वरूपाचे पत्र लिहीत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.


'मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलावून नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. राहुल गांधी यांची २०१७ साली काँग्रेस अध्यक्षपदावर निवड झाली होती.


लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून २५ मे रोजीच्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केला. काँग्रेसच्या कार्यकारी समितीने एकमताने त्यांचा राजीनामा फेटाळला. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक मोठया नेत्यांनी त्यांची भेट घेऊन राजीनाम्याच्या निर्णयावरून मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ५२ जागा जिंकता आल्या. २०१४ च्या तुलनेत काँग्रेसच्या फक्त आठ जागा वाढल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details