महाराष्ट्र

maharashtra

भारत-ऑस्ट्रेलिया संबंध सुदृढ करणार, मोदी आणि स्कॉट मोरिसन यांची चर्चा

By

Published : Jun 4, 2020, 12:29 PM IST

Updated : Jun 4, 2020, 4:53 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यामध्ये ऑनलाइन परिषद पार पडली. यात आरोग्यसेवा, व्यापार आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रांत द्विपक्षीय संबंधाना आणखी व्यापक आणि मजबूत करण्यावर चर्चा झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध दृढ करण्याची ही 'योग्य वेळ आणि योग्य संधी' असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

india australia strategic ties
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांमध्ये ऑनलाइन शिखर परिषद पार पडली

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यामध्ये ऑनलाइन परिषद पार पडली. यामध्ये आरोग्य सेवा, व्यापार आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रांत द्विपक्षीय संबंधाना आणखी व्यापक आणि मजबूत करण्यावर चर्चा झाली. भारत ऑस्ट्रेलिया संबंध दृढ करण्याची ही 'योग्य वेळ आणि योग्य संधी' असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी येत्या काळात एकत्र काम करणार असल्याचे ते म्हणाले. आपल्या भौगोलिक क्षेत्रातील स्थिरतेच्या दृष्टीने दोन्ही देशांतील मैत्री महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे जगाच्या हितासाठी आपण एकत्र कसे काम करतो, यासंदर्भातील घटकांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाशी भारताचे संबंध व्यापक व वेगवान गतीने वाढवण्यास वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. हे संबंध फक्त दोन देशांसाठीच नव्हे, तर इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि जगासाठीही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. जागतिक महामारीच्या या काळात भारताच्या व्यापक राजनैतिक भागीदाराची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण ठरेल. कोरोनाच्या आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणामांपासून मुक्त होण्यासाठी जगाला सर्वसमावेशक भूमिकेची आवश्यकता आहे. यासाठी सहयोगी दृष्टीकोनाची गरज असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच ऑनलाइन द्विपक्षीय परिषद घेतली.

२००९ मध्ये दोन्ही देशांनी उभयांतील संबंधांना 'स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप' पातळीवर नेले. तेव्हापासून दोन्ही देशांनी अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य वाढवले आहे. आंतरराष्ट्रीय धोरणांसंबंधी २०१७ साली 'व्हाईट पेपर'मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हिंद महासागरातील देशांमधील प्रख्यात सागरी सामर्थ्य असणारा देश आणि ऑस्ट्रेलियाचा अग्रगण्य भागीदार म्हणून मान्यता दिली होती. यानंतर गेल्या काही वर्षांत द्विपक्षीय आर्थिक गुंतवणूकीत वाढ झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार २०१८-१९ मध्ये दोन्ही देशांतील व्यापार २१ अब्ज युएस डॉलर्स होता.

ऑस्ट्रेलियाची भारतातील एकूण गुंतवणूक सुमारे १०.७४ अब्ज डॉलर्स(युएस) आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये भारताची एकूण गुंतवणूक १०.४५ अब्ज डॉलर्स आहे. ऑस्ट्रेलियन सुपर पेन्शन फंडने भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूकीत तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या निधीमध्ये एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मागील काही वर्षांत दोन्ही देश सागरी सहकार्याच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहेत. २०१५ साली भारत आणि ऑस्ट्रेलियाने आपला पहिला द्विपक्षीय नौसैनिक अभ्यास 'ऑसिइडेक्स' सुरू केला. या विषयावर विशेषतः हिंद महासागरात संरक्षण आणि सागरी सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांचे लक्ष असेल, असे पंतप्रधान म्हणाले. ऑस्ट्रेलिया सीमावर्ती दहशतवादाबाबत भारताच्या भूमिकेस पाठिंबा देत होता. तसेच पाकिस्तानने आपल्या भूमीतील सक्रीय दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास ऑस्ट्रेलियाने सांगितले. अझर मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने यूएनएससीच्या ठरावाला देखील पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले.

Last Updated : Jun 4, 2020, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details