शिमला- कोरोना महामारीमुळे अनेकांना घरातून काम करावे लागत आहे. तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण आणि आभासी माध्यमातून शिकावे लागत आहे. बहुतांश शिक्षण संस्थांनी ऑनलाईन वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. तरीही देशातील अनेक खेड्यांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत.
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील मुलांना स्मार्ट वर्गाच्या सुविधा मिळत नाहीत. ऑनलाईन वर्ग सुरू राहण्यासाठी वेगवान इंटरनेटची गरज आहे. मात्र किनौर येथील अनेक भागात साधे २जी इंटरनेट मिळणे कठीण आहे. त्यामुळे शेकडो मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण स्वप्नवतच ठरले आहे.
कुनो चरंग येथील रहिवासी असलेला विवेक म्हणाला, की आमच्या खेड्यामध्ये इंटरनेटची नीटशी व्यवस्था नाही. त्यामुळे आम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये अडचणी येत आहेत. काल्पातील हरलीन ही विद्यार्थिनी म्हणाली, की गेल्या महिन्यापासून आम्ही ऑनलाईन शिक्षणाकडे वळलो आहोत. मात्र, खराब इंटरनेट कनेक्शनमुळे आम्हाला अडथळे येत आहे. वेळेवर आम्हाला लिंक सुरू करता येत नाहीत.
किनौर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी हिमाचल प्रदेशाच्या इतर भागात शिकत होते. कोरोना महामारीमुळे टाळेबंदी लागू केल्यानंतर ते आपल्या घरी परतले आहेत. मात्र, इंटरनेट नसल्याने हे विद्यार्थी ऑनलाईन शिकू शकत नाहीत त्यामुळे पालकांचीही डोकेदुखी वाढली आहे. पालक शांत नेगी म्हणाले, की किनौर जिल्ह्यातील बहुतांश भागात वेगवान इंटरनेट नाही. व्हिडिओ कॉल करण्यासाठी ३जी व ४जी इंटरनेट नाही.
जवळपास ६० वर्षे उलटली तरी गावांना नाही दूरसंचार सेवा
स्थानिकांच्या माहितीनुसार कुनो चंरग, रोपा खोरे, हँगो चुलिंग, छिटकुल आणि सीमेच्या अनेक भागात इंटरनेटची समस्या आहे. इंटरनेटच नव्हे तर फोन करणेही नागरिकांना कठीण जाते. सरपंच पुर्ण सिंह नेगी म्हणाले, की कुन्नु चरंग येथे दूरसंचाराच्या योग्य सुविधा नाहीत. जवळपास ६० वर्षे उलटली तरी गावांना दूरसंचार सेवा नाही. असे असेल तर मुलांना ऑनलाईन शिक्षण कसे मिळणार आहे? हे शक्य नाही. इंटरनेटचा वेग कमी असल्याने मुले ही लॅपटॉप आणि मोबाईलवर अधिक वेळ वाया घालवितात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांच्या खर्चातही वाढ होत आहे. टाळेबंदीने मंदीची स्थिती असल्याने सर्वच पालकांना लॅपटॉप आणि मोबाईल मुलांसाठी खरेदी करता येत नाही.