२०१९ ला भाजप सरकार आल्यानंतर २०२४ला निवडणुकांची गरजच नाही - साक्षी महाराज - bjp
नुकतेच काही दिवसांपूर्वी साक्षी महाराज यांनी भाजपला 'आपल्याला पुन्हा उमेदवारी न दिल्यास चांगले परिणाम होणार नाहीत,' अशी धमकी पत्राद्वारे दिली होती. मात्र, नंतर ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
उन्नाव - वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एका वक्तव्याची भर टाकत नव्या वादाला सुरुवात केली आहे. वोकसभा निवडणुकांना अवघा एक महिना बाकी असताना त्यांनी '२०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजप सरकार आल्यानंतर २०२४ला पुन्हा निवडणुका घेण्याची गरजच पडणार नाही. ही 'मोदी त्सुनामी'ची कमाल आहे,' असे म्हटले आहे.
'मोदी नावाची एक त्सुनामी आहे. देशात जागरूकता आली आहे. मला वाटते की, या निवडणुकांनंतर २०२४ मध्ये निवडणूक होणार नाही. केवळ हीच निवडणूक होणार आहे. या देशासाठी उमेदवार जिंकण्याचे काम करतील,' असे साक्षी महाराजांनी गुरुवारी उन्नाव येथे म्हटले. लोकशाही प्रक्रियेतून खासदार झालेल्या व्यक्तीला सत्तेत आल्यानंतर निवडणुका महत्त्वाच्या किंवा आवश्यक वाटत नाहीत, आणखी ५ वर्षंनी त्या होणारच नाहीत असे वाटते, ही चकित करायला लावणारी बाब ठरत आहे.
नुकतेच काही दिवसांपूर्वी साक्षी महाराज यांनी भाजपला 'आपल्याला पुन्हा उमेदवारी न दिल्यास चांगले परिणाम होणार नाहीत,' अशी धमकी दिली होती. ही धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली होती. ६३ वर्षीय महाराजांनी हे पत्र भाजपचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष महेंद्र नाथ पांडे यांनी पाठविले होते. मात्र, नंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हा साक्षी महाराजांनी यावर आश्चर्य व्यक्त करत पत्र लीक कसे झाले याची चौकशी झाली पाहिजे, असे म्हटले होते.
पंतप्रधान मोदी सार्वत्रिक निवडणुकामध्ये पुन्हा निवडून येण्याच्या प्रयत्नात आहेत. निवडणुका ११ एप्रिलला होतील. २३ मेला मतमोजणी होईल. त्यानंतर देशाचे पुढील पंतप्रधान कोण होणार, ते ठरेल.