महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरात 'बर्ड-फ्लू'चे थैमान! कित्येक राज्यांमध्ये शिरकाव - देशामध्ये बर्ड फ्लू

एव्हियन इन्फ्लुएन्झा या विषाणूच्या एच५एन८ या स्ट्रेनमुळे हा विषाणू पसरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या विषाणूचा मानवांना धोका नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र, हा नवा स्ट्रेन असल्यामुळे पुढे काहीही होऊ नये यासाठी विशेष खबरदारी बाळगणे आवश्यक असल्याचेही संशोधकांनी सांगितले आहे..

new strain of Bird flu virus Avian influenza hits India
देशभरात बर्ड-फ्लूचे थैमान! कित्येक राज्यांमध्ये शिरकाव

By

Published : Jan 5, 2021, 7:05 PM IST

हैदराबाद :कोरोना महामारी, त्यात नवा स्ट्रेन हे सर्व सुरू असतानाच आता आणखी एका विषाणूने तोंड वर काढले आहे. देशातील कित्येक राज्यांमध्ये एव्हिअन इन्फ्लुएंझा या विषाणूने थैमान घातले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि केरळमध्ये यामुळे हजारो पक्षांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

एव्हियन इन्फ्लुएन्झा या विषाणूच्या एच५एन८ या स्ट्रेनमुळे हा विषाणू पसरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या विषाणूचा मानवांना धोका नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र, हा नवा स्ट्रेन असल्यामुळे पुढे काहीही होऊ नये यासाठी विशेष खबरदारी बाळगणे आवश्यक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

राजस्थानमध्ये समोर आले पहिले प्रकरण..

२५ डिसेंबरपासूनच राजस्थानच्या झालावाडमध्ये कावळ्यांच्या मृत्यूचे प्रकार समोर येऊ लागले होते. पुढे आठवडाभरातच जिल्ह्यातील शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने एक किलोमीटरचा परिसर सील केला होता. तसेच, जिल्ह्यातील अंड्यांची विक्री थांबवण्याचे निर्देश दिले होते. तसेच, यानंतर जिल्हाधिकारी निकया गोहाएन यांनी त्वरीत एका कारवाई समितीची स्थापना केली होती.

राजस्थानपाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये प्रसार..

राजस्थानपाठोपाठ मध्य प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे कावळ्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या मृत कावळ्यांची तपासणी करण्यात आली असता, त्यांनाही बर्ड-फ्लूची लागण झाल्याचे समोर आले. इंदूर, मंडसौर, देवस, उज्जैन आणि अगर जिल्ह्यांमध्ये असे प्रकार दिसून आले. त्यांपैकी इंदूर आणि मंडसौरमधील कावळ्यांच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, इतर जिल्ह्यातील अहवाल मिळणे बाकी आहे.

हिमाचलमध्ये हजारो स्थलांतरीत पक्षांचा मृत्यू..

हिमाचल प्रदेशात 'बर्ड फ्लू' आजाराचा प्रसार होत असून आत्तापर्यंत सतराशेपेक्षा जास्त स्थलांतरीत पक्षांचा मृत्यू झाला आहे. कांडगा जिल्ह्यातील पौंग धरणक्षेत्रात स्थलांतरीत पक्षांचा मृत्यू झाला असून प्रशासन सतर्क झाले आहे. धरणक्षेत्रात आणि शेजारील चार मतदार संघात मटन,अंडी, मासे विक्रीला प्रशासनाने बंदी आणली आहे.

प्रशासनाने बर्ड फ्लूच्या भीतीने धरणच्या १० कि. मी परिसरात सर्व व्यवहारांवर बंदी आणली आहे. नागरिकांनी त्यांच्याजवळील जनावरांना धरण परिसरात जाण्यापासून रोखावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

केरळमध्ये राज्य आपत्ती जाहीर..

केरळमध्येही बर्ड-फ्लूचा कहर सुरू झाला आहे. 'एच५एन८ एव्हिअन फ्लू' विषाणूमुळे पसरत असलेल्या या बर्ड-फ्लूला केरळमध्ये राज्य आपत्ती घोषित केले आहे.

यानंतर या फ्लूचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोट्टायम आणि आलापुळा जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट घोषित केला आहे. आलापुळामधील नेदुमुदी, ताकाळी, पल्लीप्पाडू आणि कारुवट्टा या तालुक्यांमध्ये; तर कोट्टायमच्या नीनदूर तालुक्यात याचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

केरळचे राज्य वन आणि पशुसंवर्धन मंत्री के. राजू यांनी सांगितले, की या फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत. हा विषाणू मानवांवर परिणाम करत नसल्याचे आतापर्यंत समोर आले नाही. मात्र, तसे होणारच नाही असे म्हणणे निष्काळजीपणाचे ठरेल असेही ते म्हणाले.

हरियाणामध्ये लाखो कोंबड्यांचा मृत्यू..

हरियाणामध्येही गेल्या काही दिवसांमध्ये लाखो कोबंड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यातील तीन पोल्ट्री फार्म्समध्ये मिळून गेल्या आठवड्यातच सुमारे एक लाख कोंबड्या ठार झाल्या आहेत. या कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, त्यांचे नमुने भोपाळला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, देशातील बर्ड-फ्लूची लाट पाहता, या कोंबड्यांचा मृत्यूदेखील बर्ड-फ्लूमुळेच झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात अद्याप शिरकाव नाही..

सुदैवाने महाराष्ट्रात अजून तरी या बर्ड-फ्लूचा शिरकाव झालेला नाही. पण, असे असले तरी बेफिकीर न राहता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनामध्ये आपण मास्क लावणे, हात धुणे आणि इतर प्रकारची काळजी घेत आहोत, तीच काळजी घ्यावी. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा :पुढील आठवड्यात होऊ शकते कोरोना लसीकरणाला सुरुवात; आरोग्य सचिवांचे संकेत

ABOUT THE AUTHOR

...view details