मल्लपूरममधील भूस्सखलनातील मृतांचा आकडा ११ वर; ५० जण बेपत्ता - केरळ पाऊस
संततधार पावसामुळे मल्लपूरमध्ये भूस्सखलन झाल्याने त्यात सापडून ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण बेपत्ता झाले आहेत. ही घटना कावल्लापारा गावात गुरुवारी रात्री ८ वाजता घडली होती.
![मल्लपूरममधील भूस्सखलनातील मृतांचा आकडा ११ वर; ५० जण बेपत्ता](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4109262-690-4109262-1565541665332.jpg)
मल्लपूरम- केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे मल्लपूरमध्ये भूस्सखलन झाल्याने त्यात सापडून ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण बेपत्ता झाले आहेत. ही घटना कावल्लापारा गावात गुरुवारी रात्री ८ वाजता घडली होती. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भूस्सखलनामुळे २५ ते २६ घरे जमीनदोस्त झाली आहेत. ढिगाऱ्यांमधून आत्तापर्यंत ११ मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या भागात असलेला एक पूलही कोसळला आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, अग्नीशामक दल यांच्या संयुक्त मदतीने बचावकार्य सुरू आहे.
राहुल गांधी यांनी त्यांच्या वायनाड मतदारसंघात जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली त्यावेळी त्यांनी कावल्लापारा गावालाही भेट दिली. तेथे सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. तर बचाव कार्यात अजून मोठ्या मदतीची गरज असल्याचे ते म्हणाले.