महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 22, 2020, 8:17 AM IST

Updated : Mar 22, 2020, 11:28 PM IST

ETV Bharat / bharat

LIVE JANTA CURFEW : केरळमध्ये आढळले तब्बल १५ रुग्ण, राज्यातील एकूण संख्या ६७

जनता कर्फ्यू
जनता कर्फ्यू

23:06 March 22

कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 396 वर,7 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली -  देशामध्ये कोरोनाने दहशत निर्माण करायला सुरुवात केली आहे. भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 396 वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे 7 जणांचा  मृत्यू झाला आहे. तर 24 कोरोनामधून बरे झाले असे त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

23:05 March 22

झारखंडमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाउन

नवी दिल्ली -  कोरोनाचा प्रभाव पाहता झारखंड सरकारने 31 मार्चपर्यंत लॉकडाउन करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

19:23 March 22

इतर राज्यांपाठोपाठ बिहारही लॉकडाऊन..

पाटणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार राज्यही लॉकडाऊन करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. यादरम्यान सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

19:20 March 22

गोवा सरकारने जनता कर्फ्यू वाढवला, तीन दिवस राहणार कायम..

पणजी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनता कर्फ्यूचा कालावधी वाढवण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. राज्यामध्ये आता आणखी तीन दिवस जनता कर्फ्यू लागू असणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

19:09 March 22

हरियाणामधील जनता कर्फ्यू वाढवला; सात जिल्हेही करणार लॉकडाऊन..

चंदीगड -हरियाणामधील जनता कर्फ्यूची वेळ उद्या (सोमवार) सकाळी सात वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच राज्यातील सात जिल्ह्यांनाही लॉकडाऊन करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिली. हरियाणामधील फरीदाबाद, गुरुग्राम, रोहतक, झाज्जर, सोनिपत, पानिपत आणि पंचकुला या जिल्ह्यांना बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत ही बंदी लागू राहील.

19:03 March 22

कर्नाटकात आढळला नवा रुग्ण, दुबईवरून आलेल्या २२ वर्षीय तरुणाला झाली लागण..

बंगळुरू - दुबईहून आलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २६वर पोहोचली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या आयुक्त सिंधु बी. रुपेश यांनी ही माहिती दिली.

18:48 March 22

केरळमध्ये आढळले तब्बल १० नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६७..

तिरुवअनंतपुरम - केरळमधील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. आज दुपारी कासारगोडमध्ये पाच रुग्ण आढळले होते. त्यानंतर, आता राज्यात आणखी दहा रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कन्नूर जिल्ह्यामध्ये चार, एर्नाकुलममध्ये दोन, मलाप्पुरम मध्ये दोन आणि कोळीकोडमध्ये २ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ६७वर पोहोचली आहे. त्यांपैकी तिघांवरील उपचार यशस्वी झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

18:46 March 22

देशाची राजधानीही लॉकडाऊन..

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीही बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उद्या (सोमवार) सकाळी सहापासून ते ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत दिल्ली लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान ज्या कोणा नागरिकाला मदतीची गरज असेल, त्याला त्याची कागदपत्रे न मागता, सरसकट सगळ्यांना मदत करण्यात येईल. तसेच, प्रदेशातील सर्व खासगी कंपन्या आणि सार्वजनिक वाहतूक बंद राहील, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

यासोबतच, दिल्लीमध्ये येणाऱ्या सर्व आंतरदेशीय विमानांना रद्द करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये सध्या २७ रुग्ण आहेत, ज्यामधील सहा जणांना भारतातच लागण झाली आहे. बाकी रुग्ण परदेशातून परत आले आहेत, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

18:44 March 22

तेलंगाणाही ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांची घोषणा..

हैदराबाद -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तेलंगाणा राज्य लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १८९७च्या महामारी कायद्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

18:06 March 22

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देशभरामधून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आज सांयकाळी 5 वाजता देशवासियांनी टाळ्या-थाळ्या अन् घंटेचा नाद करत कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त केले. जनतेसह राज्यांचे मुख्यमंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोरोनाशी लढणाऱ्यांना टाळ्या वाजवून सलामी दिली.

वाचा :देशभरात घुमला टाळ्या-थाळ्या अन् घंटानाद, अवघ्या देशानं व्यक्त केली कृतज्ञता

18:05 March 22

मुंबई - राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राज्यातील जनता कर्फ्यू हा उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती दिली.

वाचा :कोरोना अपडेट : राज्यात पहाटे पाच वाजेपर्यंत जनता कर्फ्यू वाढवला - आरोग्यमंत्री

17:07 March 22

मध्यप्रदेशमध्ये आढळला पहिला रुग्ण, लंडनहून आलेली विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह..

भोपाळ- लंडनहून आलेल्या एका विद्यार्थिनीला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले आहे. मध्य प्रदेशमधील ती पहिली कोरोना रुग्ण ठरली आहे. 

17:04 March 22

केरळमध्ये आढळले पाच नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५७वर..

तिरुवअनंतपुरम- केरळमध्ये कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण कासारगोड जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५७वर पोहोचली आहे.

16:50 March 22

जोधपूरमध्ये आढळला आणखी एक रुग्ण; राज्यातील रुग्णांची संख्या २६ वर..

जयपूर- जोधपूरमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २६वर पोहोचली आहे. राजस्थान आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहित सिंह यांनी ही माहिती दिली.

16:33 March 22

देशभरातील ७५ जिल्ह्यांना लॉकडाऊन करण्याचे आदेश..

नवी दिल्ली - ज्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा ७५ जिल्ह्यांना लॉकडाऊन करण्याचे आदेश केंद्र सरकारने संबंधित राज्यांना दिले आहेत. या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व सेवा बंद करण्यात याव्यात असे निर्देश सरकारने दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी ही माहिती दिली.

16:31 March 22

दिल्लीमध्ये २२ ते ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू..

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. २२ मार्च संध्याकाळी नऊ वाजल्यापासून ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे.

15:50 March 22

कर्नाटकमधील नऊ जिल्हे होणार लॉकडाऊन, राज्य सरकारचा निर्णय..

बंगळुरू- कर्नाटकमधील नऊ जिल्ह्यांना लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये बंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण, दक्षिण कन्नड, कलबुर्गी, कोडागु, चिक्काबल्लापूर, मैसूर आणि हुबळी हे जिल्हे ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. यासोबतच सर्व सरकारी, खासगी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांना ३१ तारखेपर्यंत घरूनच काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच बंगळुरुमधील सर्व मेट्रो ३१ तारखेपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.

15:44 March 22

गुजरातमध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यू, देशातील बळींची संख्या ७ वर..

गांधीनगर - गुजरातमध्ये कोरोनाचा पहिला बळी आढळून आला आहे. सूरतमध्ये रविवारी कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला. यामुळे देशातील एकूण बळींची संख्या सातवर पोहोचली आहे.

सूरतमध्ये बळी गेलेल्या व्यक्तीचे वय ६९ वर्षे होते. त्यांना आधीपासूनच वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले होते. यासोबतच, वडोदऱ्याच्या रुग्णालयातही एखा ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र, या महिलेचा कोरोनासंबंधीचा अहवाल येणे बाकी आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने दिली.

15:38 March 22

ओडिशामधील पाच जिल्हे आणि आठ शहरे 'लॉकडाऊन'..

भुवनेश्वर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओडिशामधील पाच जिल्हे आणि आठ शहरे लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. खोर्धा, कटक, गंजम, केंद्रपाडा आणि अंगुल या जिल्ह्यांमध्ये तसेच पुरी, रोउरकेला, संबंलपूर, झार्सुगुडा, बालासोर, जयपूर रोड, जयपूर शहर आणि भद्रक ही शहरे २२ ते २९ मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार आहेत.

15:26 March 22

द्रमुकचे आमदार-खासदार मदतीसाठी देणार एक महिन्याचे वेतन..

तामिळनाडू - राज्यातील द्रमुकच्या सर्व खासदार आणि आमदारांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री मदत निधीमध्ये द्यावा, अशी घोषणा पक्षाने केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

15:08 March 22

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७५वर; संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा..

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. काही प्रमुख शहरांमध्ये कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली.

  • लॉकडाऊन दरम्यान राज्यात धान्य, दूध, भाजीपाला आणि वीजेसाठीची वाहतूक सुरू राहणार आहे.
  • खासगी बस, लोकल आणि एसटी सेवा बंद.
  • बससेवा केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठी सुरू राहणार.
  • सरकारी कार्यालयात केवळ ५ टक्के कर्मचारी राहतील.
  • परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या विमानांना बंदी.
  • अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी टाळण्याचे आवाहन.
  • कामगारांना किमान वेतन देण्याचे कंपन्यांना आवाहन.
  • गरज पडल्यास ३१ मार्चनंतरही कर्फ्यू सुरू ठेवणार.

14:55 March 22

उत्तराखंडमधील कर्फ्यू ३१ मार्चपर्यंत वाढवला..

देहराडून- कोरोना विषाणूविरोधात सुरू असलेला देशव्यापी जनता कर्फ्यू पाहता, राज्यभरात ३१ मार्चपर्यत कर्फ्यू लागू करण्यात येणार असल्याचे उत्तराखंड सरकारने ठरवले आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी ही माहिती दिली. दरम्यान, राज्यातील अन्न व औषधांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यामधील आंतरराज्यीय आणि शहरी बससेवाही रद्द करण्यात आल्या आहेत. लोकांनी प्रवास टाळून जिथे आहेत, तिथेच राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

14:45 March 22

गुजरातमधील कोरोनाग्रस्तांचे नाव जाहीर करणार, उपमुख्यमंत्र्यांची माहिती.

गांधीनगर - गुजरातमधील कोरोनाग्रस्त १८ लोकांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिली. या १८ नागरिकांना जे-जे लोक आतापर्यंत भेटले आहेत, त्यांना सावध होऊन वेळीच आवश्यक पावले उचलता यावीत यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

13:41 March 22

गुजरातमध्ये आढळले चार नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर..

गांधीनगर - गुजरातमध्ये कोरोनाचे आणखी चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १८वर पोहोचली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी ही माहिती दिली.

13:38 March 22

इतिहासात पहिल्यांदाच मुंबई लोकल सेवा आठ दिवसांसाठी बंद राहणार, धावत्या मुंबईला लागला ब्रेक

माल वाहतूक गाड्या सोडून कोणतीही प्रवासी रेल्वे ३१ मार्चपर्यंत धावणार नाही. असा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. मुंबईतील लोकल सेवाही बंद राहणार आहे. यासह कोकण रेल्वेसेवाही बंद राहणार.  

13:27 March 22

रेल्वेची सर्व प्रवासी वाहतूक ३१ मार्चपर्यंत बंद

रेल्वे मंत्रालयाने जारी केले पत्रक

13:11 March 22

रेल्वे मंत्रालयाने जारी केले पत्रक

12:26 March 22

महाराष्ट्र- तेलंगाणा सीमा बंद. महाराष्ट्रातील वाहनांना तेलंगाणात येण्यास परवानगी नाही. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता तेलंगाना सरकारचा निर्णय

महाराष्ट्र- तेलंगाणा सीमा बंद

11:48 March 22

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्येही कडकडीत बंद

राजधानी दिल्ली बंद

11:35 March 22

बिहारमध्ये कोरोनाचा पहिला बळी; भारतामध्ये एकूण सहा बळी

11:16 March 22

जनता कर्फ्यूमुळे केरळमधील पर्यटनस्थळे ओस. तिरुवनंतपूरम मधील शानगुमुघम बीचवर शुकशुकाट

जनता कर्फ्यूमुळे केरळमधील पर्यटनस्थळे ओस

11:11 March 22

संपूर्ण पंजाब राज्य बंद ठेवण्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा आदेश

11:05 March 22

हिमाचल प्रदेशात रेल्वे सेवा बंद. उत्तर रेल्वेने कलका शिमला हेरिटेज लाईनवरील सर्व गाड्या रद्द केल्या

हिमाचल प्रदेशात रेल्वे सेवा बंद

10:59 March 22

भारतामध्ये ३२४ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग

10:59 March 22

महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी. रुग्णाला मधुमेह आणि इतर शारिरीक व्याधी होत्या. भारतामध्ये एकून ६ जणांचा मृत्यू

10:33 March 22

दिल्लीत पोलीस कर्मचारी वाहन चालकाला गुलाबाचे फुल देऊन घरात राहण्याचं आवाहन करताना

दिल्ली जनता कर्फ्यू

10:12 March 22

ईशान्य भारतही बंद...मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये रस्ते पडले ओस

10:08 March 22

इटलीत अडकलेल्या भारतीयांची दुसरी बॅच दिल्ली विमानतळावर दाखल. एअर इंडियाच्या विशेष विमानाने रोमवरून २६३ विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले. सर्वांची तपासणी करुन विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. काल दुपारी विशेष विमान इटलीला गेले होते.

10:03 March 22

जनता कर्फ्यूला सुरुवात झाली असून सर्व नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे आवाहन पाळावे. घरातून बाहेर न पडता एकांतवासात रहा आणि देशाचे महामारीपासून संरक्षण करा - गृहमंत्री अमित शाह

09:51 March 22

कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचं मोदींचे देशवासियांना आवाहन. सर्वजण देशव्यापी अभियानात सहभागी व्हा. आपला संकल्प आणि संयम या महामारीला नष्ट करेल - पंतप्रधान मोदी

08:34 March 22

केरळची राजधानी तिरुवनंतरपूरमध्ये कडकडीत बंद. शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट

08:23 March 22

तेलंगाणातील हैदराबाद शहरातील हिमायतनगर भागात जनता कर्फ्यूला उस्फूर्त प्रतिसाद

08:07 March 22

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील मेट्रो सेवा बंद

08:03 March 22

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोना बाधीत रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानुसार आज देशभरामध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. आज (रविवारी) सकाळी ७ वाजेपासून बंद सुरु झाला असून रात्री नऊ पर्यंत पाळण्यात येणार आहे. देशभरातील नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व व्यापार, वाहूतक, उद्योगधंदे, व्यवसाय, रेल्वे, मेट्रो, बस यांना ब्रेक लागणार आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ३३२ झाली आहे.

19 मार्चला केले होते देशाला संबोधन -

देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, सरकारची यावर पूर्ण नजर आहे. देशातल्या १३० कोटी नागरिकांनी या जगभरातील साथीचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या निर्देशांचे पालन करावे. तसेच नागिरिकांनी संयम बाळगावा आणि नागरिकांनी घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नागरिकांनी स्वतःला कोरोना होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच इतरांचेही कोरोनापासून संरक्षण करावे. जर गरजेचे असले तरच घरातून बाहेर पडावे आणि शक्य असतील तेवढी कामे कामे घरातून करावीत, असे मोदी म्हणाले.

रुग्णालयात काम करणाऱ्या व्यक्ती, सरकारी कर्मचारी, प्रसारमाध्यमातील कर्मचाऱ्यांनीच फक्त कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी घराबाहेर पडावे, असेही मोदी म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांनी घरातून बाहेर पडणे टाळावे आणि सर्वसामान्य लोकांनी स्वतःहून, स्वतःसाठी संचारबंदी लागू करावी. मी प्रत्येक देशवासियांकडून समर्थन मागत आहे.

जनता कर्फ्यू म्हणजे काय?.. पंतप्रधानांच्या शब्दात -

जनता कर्फ्यू म्हणजे जनतेकडून लागू केलेले जनतेसाठीचा कर्फ्यू. रविवारी म्हणजे २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान सर्व नागरिकांनी स्वतःहून संचारबंदीचे पालन करावे, असे मोदी म्हणाले होते. रविवारी कोणीही घरामधून बाहेर पडू नये. गर्दी करू नये. सर्व राज्य सरकारांनी इतर संघटनांनी संचारबंदी लागू करण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे. तसेच सर्वसामान्य तपासणीसाठी रुग्णालयात जाऊ नये. जर गरज असेल. तर ओळखीच्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून सल्ला घ्यावा, असेही मोदी म्हणाले. राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूचं नेतृत्व करावं, असही पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

आरोग्य सेवकांसाठी थाळ्या आणि टाळ्या वाजवू...

देशातील आरोग्य सेवा करणाऱ्यांच्या कौतुकासाठी रविवारी सायकांळी 5 वाजता आपल्या घरासमोर उभे राहून सर्वांनी कोरोना प्रभाव थांबविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आभार व्यक्त करावे. तसेच घरासमोर, गॅलरीमध्ये उभे राहून टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून आभार व्यक्त करण्याचे आवाहनही मोदींनी केले.

संकटाचा सामना करू -

गेल्या 2 महिन्यापासून 130 कोटी भारतीयांना कोरोना संकटाचा सामना केला आहे. येत्या काळातही प्रत्येक जण आपल्या कर्तव्याचे पालन करेल, याचा मला विश्वास आहे. सध्या देशासमोर समस्या निर्माण झाली आहे. यामध्ये अफवा आणि खोट्या बातम्या पसरतात, अशा वेळी प्रत्येकाने सतर्क राहायला हवे. काही दिवसांमध्येच नवरात्री उत्सव येत आहे. हे पर्व शक्ती आणि उपासनेचे पर्व आहे. भारत पूर्ण शक्तीने कोरोनाचा सामना करेल आणि पुढे जाईल, असे मोदी भाषणाच्या शेवटी म्हणाले.

Last Updated : Mar 22, 2020, 11:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details