महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 24, 2020, 9:09 PM IST

Updated : Mar 24, 2020, 9:17 PM IST

ETV Bharat / bharat

जान है तो जहान है... आज मध्यरात्रीपासून २१ दिवस देश लॉकडाऊन - पंतप्रधान मोदी

१४ एप्रिलपर्यंत नागरिकांना जेथे आहे तेथेच घरामध्ये थांबावे लागणार आहे. महामारीमुळे २१ दिवस देश बंद ठेवण्याची ही देशातील पहिली वेळ आहे. कोरोनाला हरविण्यासाठी घरात राहण्याचा संकल्प करण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज मोठी घोषणा केली. आज रात्री १२ वाजेपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत नागरिकांना जेथे आहे तेथेच घरामध्ये थांबावे लागणार आहे. महामारीमुळे २१ दिवस देश बंद ठेवण्याची ही देशातील पहिली वेळ आहे. कोरोनाला हरविण्यासाठी घरात राहण्याचा संकल्प करण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

  • कोरोना महामारीबद्दल तुमच्यासोबत बोलण्यासाठी आलो आहे. २२ मार्चला आपण जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला भारतीय नागरिकांनी संपूर्ण जबाबदारीने सहकार्य केले. जनता कर्फ्यूला भारतीयांनी यशस्वी केले आहे.
  • जगातील महासत्तांनाही या महामारीने ग्रासले आहे. ते देश या महामारीला संपवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत असे नाही. मात्र सर्व प्रकारच्या तयारीनंतरही ही महामारी वाढतच चालली आहे.
  • दोन महिन्यांच्या अभ्यासानंतर असे निष्कर्ष निघत आहेत की, सोशल डीस्टंन्सिग हा एकमेव उपाय दिसत आहे. घरात स्थानबद्ध होऊन रहा. कोरोनाला हरवायचे असेल तर त्याची संक्रमणाची सायकल तोडावी लागेल.
  • काही लोक अजूनही या गैरसमजात आहे की सोशल डिस्टन्सिंग फक्त रोगींसाठीच गरजेची आहे. मात्र तसे नाही. पंतप्रधानापासून सामान्यातील सामान्य माणसासाठीही ती गरजेची आहे.

मोदींचे महत्त्वाचे निर्णय

  • आज रात्री १२ वाजता संपूर्ण देशात लॉकडाऊन.
  • आज मध्यरात्रीपासून घराच्या बाहेर निघण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
  • गल्ली, गाव, तालुका, जिल्हा, राज्य सगळीकडे बंदी
  • जनता कर्फ्यूपेक्षा हे जास्त कडक असणार आहे.
  • कोरोना महामारीच्या निर्णायक लढाईसाठी हे करणे आवश्यक आहे. तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करणे ही देशाच्या सरकारची प्राथमिकता आहे. त्यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही जिथे आहात तिथेच राहा.
  • हा लॉकडाऊन तीन आठवड्यांचा अर्थात २१ दिवसांचा असेल.
  • २१ दिवस घरात बसून राहा. काही झाले तरी २१ दिवस घरातच राहा. हे मी तुम्हाला पंतप्रधान म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य या नात्याने सांगत आहे. जे लोक घरात आहे ते सोशल मीडियावर अतिशय कल्पक पद्धतीने संदेश देत आहेत.

को -कोई

रो - रोड पे

ना - ना निकले

  • एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हा विषाणू गेला तर त्याला त्याचे लक्षण दिसण्यासाठी बरेच दिवस लागतात. या काळात तो अनेकांच्या संपर्कात येतो. त्यामुळे तो हा रोग अनेकांपर्यंत पसरु शकतो. वणव्यासारखा हा रोग पसरू शकतो.
  • या वेगाने वाढला कोरोना
  • जागतिक आरोग्य संस्थेनुसार पहिल्या १ लाख लोकांना हा संसर्ग होण्यास ६७ दिवस लागले आणि नंतर पुढच्या एक लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त ११ दिवस लागले. त्यानंतच्या १ लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त चार दिवस लागले. हा रोग एकदा पसरायला लागला की त्याला थांबवणे फार कठीण आहे.
  • इटली असेल नाही तर अमेरिका या देशांची आरोग्य सेवा आणि उपाययोजना या जगात अव्वल दर्जाच्या मानल्या जातात असे असले तरी हे देश कोरोनाचा प्रभाव कमी करु शकले नाही. कारण यावर उपाय काय आहे, याचा आशेचा किरण एकच आहे तो म्हणजे कित्येक आठवडे या देशातील नागरिक घराच्या बाहेर पडले नाही. त्यामुळेच यातील काही देश आता या महामारीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आमच्यासमोरही हाच एकमेव मार्ग आहे की घराच्या बाहेर पडायचे नाही. काही झाले तरी घरातच राहायचे आहे.
  • सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव सध्यातरी मार्ग आहे. घराच्या दारात लक्ष्मणरेषा घालून घ्यायची आहे. ती ओलांडायची नाही.
  • या जागतिक महामारीला आम्ही कसे कमी करु शकतो याचा विचार करायचा आहे. पावलापावला वर आम्हाला संयम बाळगायचा आहे.

जान है तो जहान है. १४ एप्रिलपर्यंत देश लॉकडाऊन

  • जोपर्यंत देशात लॉकडाऊनची स्थिती आहे तोपर्यंत आपल्याला वचन पाळायचे आहे.
  • घरात राहून तुम्ही त्या लोकांसाठी प्रार्थना करा जे आपला जीव धोक्यात टाकून कोरोनाविरोधात लढत आहे. डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य विभागाचे प्रशासन, सफाई कर्मचारी, अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर यांचा विचार करा जे सेवा करत आहे.
  • सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु राहावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरु आहेत.
  • गरीबांना कमीतकमी त्रास होईल यासाठी सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना पुढे येत आहे.
  • कोरोनाच्या रुग्णाच्या उपचारासाठी १५ हजार कोटींची तरतूद सरकारने केली आहे. आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर, सुरक्षा उपकरणे तयार करण्यात येत आहेत.
  • राज्य सरकारांना आवाहन केले आहे की, त्यांची प्राथमिकता ही आरोग्य सेवाच असली पाहिजे.
  • देशातील खासगी उद्योगही देशाच्या सोबत उभे आहेत. खासगी रुग्णालय, लॅब हे सरकारसोबत काम करण्यास तयार आहेत.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मोदींचे आवाहन

  • अशा काळात काही वेळा अफवा देखील मोठ्या प्रमाणात पसरत असतात, त्यापासून तुम्ही दूर राहा. अफवांवर विश्वास ठेवू नका.
  • मी तुम्हाला विनंती करतो की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.
  • मला विश्वास आहे की प्रत्येक भारतीय नागरिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करेल.
  • २१ दिवसांचा लॉकडाऊन मोठा काळ आहे, मात्र तुमच्या आरोग्यासाठी, जीवाच्या रक्षणासाठी फार आवश्यक आहे.
  • आपण या संकटाचा मुकाबला करुच आणि त्याच्यातून यशस्वीपणे बाहेर पडू
Last Updated : Mar 24, 2020, 9:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details