नवी दिल्ली- भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंगळवारी रात्री उशिरा सुषमा स्वराज यांना छातीत दुखण्याचा त्रास व्हायला लागला होता. यानंतर त्यांना तत्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. एम्स रुग्णालयात डॉक्टरांनी सुषमा स्वराज यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला स्वराज यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या अनेक केंद्रीय मंत्री, नेते एम्स रुग्णालयात दाखल होत आहेत.
अशी आहे कारकिर्द -
सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ साली हरियाणातील अंबाला कन्टोन्मेंट येथे झाला होता.
त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख सदस्य होते.
स्वराज यांचे शिक्षण अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयात झाले असून त्यांनी संस्कृत व राज्यशास्त्रातून पदवी प्राप्त केली.
त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे कायद्याचा अभ्यास केला.
१९७३ मध्ये, स्वराज यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
सध्या त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्या तसेच २६ मे २०१४ पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत होत्या.