नवी दिल्ली -सक्तवसुली संचलनालयाने फरार हिरे व्यापारी निरव मोदीची राजस्थानातल्या जैसलमेरमधील 48 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत आत्तापर्यंत ईडीने त्याची 329 कोटी 66 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. आर्थिक गुन्हा दाखल झाल्यानंतर निरव मोदी देश सोडून इंग्लडला पळून गेला आहे.
जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत मुंबईतील वरळी येथील चार फ्लॅट, अलिबागच्या किनाऱ्यावरील फार्म हाऊस आणि जमीन, जैसलमेरमधील पवनचक्की प्रकल्प, लंडन आणि संयुक्त अरब अमिरात मधील फ्लॅट, शेअर्स आणि बँकेतील ठेवींचा समावेश आहे. ही सर्व संपत्ती फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली आहे.
जैसलमेरमधील जोधा येथील निरव मोदीच्या मालकीच्या 12 पनवचक्क्या ईडीने जप्त केल्या आहेत. या संपत्तीची किंमत 4 कोटी ठरविण्यात आली आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने यासंबधी कोणतीही माहिती जाहीर केली नाही. फरार आर्थिक गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी 2018 साली मोदी सरकारने संपत्ती जप्तीचा कायदा आणला. भारतातून पळून जाऊन कायदेशीर प्रक्रिया टाळण्याचा आर्थिक गुन्हेगारांकडून प्रयत्न केला जातो. अशा प्रकरणात ईडी त्यांची मालमत्ता जप्त करू शकते.
मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेत निरव मोदी आणि त्याचा मामा मेहूल चोक्सीने मिळून 200 कोटी डॉलरचा कर्ज घोटाळा केल्याचा आरोप आहे. ईडीने या प्रकरणी मनी लाँड्रीगचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. 8 जूनला मुंबईतील विशेष न्यायालयाला निरव मोदीची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार ईडीला दिले.