हैदराबाद - केंद्र सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे. कोरोना संकटकाळात सरकार योग्यरितीने उपाययोजना करत नाही, असा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केला आहे. कठोर शब्दात केंद्र सरकारचा समाचार घेतला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात ८६ हजार ८२१ नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या ६३ लाखांवर पोहोचली आहे, तर मागील २४ तासात १ हजार १८१ लोकांचा बळी गेला आहे.
महाराष्ट्र -
राज्यातील कोरोना रुग्णांनी १४ लाखांचा टप्पा ओलांडला असून मृतांचा आकडा ३७ हजारांहून वर गेला आहे. गुरुवारी राज्यात ३९४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात राज्यात १६ हजार ४७६ कोरोना रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या 14 लाख 922 वर पोहोचली आहे.
दिल्ली -
दिल्लीत २५ टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये कोरोना अँटिबॉडीज तयार झाल्या असल्याचे सेरो सर्व्हेमधून समोर आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. दिल्लीतील २५ टक्के रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांच्या शरिरात अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. गेल्या सर्व्हेत ही संख्या २८.७ इतकी होती. पुढील सर्व्हे १५ दिवसांच्या आत होणार आहे, असेही जैन यांनी सांगितले.
आंध्र प्रदेश -
राज्यात मागील २४ तासात ६ हजार ७५१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 7 लाख 235 वर पोहोचली असून आतापर्यंत ६ लाख ३६ हजार ५०८ रुग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत ५ हजार ८६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.