महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एका मुलीवर फक्त पाच पैसे खर्च, 'बेटी बचाव-बेटी पढाओ'चा निधी मोदींच्या प्रचारासाठी - अप्सरा - CONGRESS

गील साडेचार वर्षात महिलांवरील अत्याचाराची संख्या चारपटीने वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ' बेटी बचाव-बेटी पढाव'ची घोषणा करत आहे. त्याचा विचार केला तर केवळ ५ पैसे एका मुलीवर खर्चाची तरतूद आहे. तर या अंदाजपत्रकातील ५६ टक्के खर्च मोदींच्या प्रचारावर खर्च केला आहे, असा आरोप अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस अप्सरा रेड्डी यांनी केला

अप्सरा रेड्डी

By

Published : Mar 7, 2019, 8:56 AM IST

Updated : Mar 7, 2019, 9:49 AM IST

पणजी- मागील साडेचार वर्षात महिलांवरील अत्याचाराची संख्या चारपटीने वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ' बेटी बचाव-बेटी पढाओ'ची घोषणा करत आहे. त्याचा विचार केला तर केवळ ५ पैसे एका मुलीवर खर्चाची तरतूद आहे. तर या अंदाजपत्रकातील ५६ टक्के खर्च मोदींच्या प्रचारावर खर्च केला आहे, असा आरोप अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस अप्सरा रेड्डी यांनी मडगावमध्ये केला.

अप्सरा रेड्डी

अप्सरा रेड्डी यांच्याकडे गोवा महिला काँग्रेसचे प्रभारीपद देण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारपासून त्या गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, सोशल मीडिया प्रमुख प्रतिभा बोरकर उपस्थित होत्या.
आपल्या राजकारणातील प्रवेशाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना रेड्डी म्हणाल्या, पत्रकार म्हणून काम करत असताना महिला, मुले आणि समाजातील दुबळा घटक यांच्याविषयी तळमळ वाटत होती. लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी ठोस राजकीय धोरण असणे आवश्यक आहे. म्हणून संधी मिळताच राजकारणात प्रवेश केला. लोक राजकारण नको म्हणतात. परंतु, राजकारण का नको? माझा प्रश्न आहे. कारण विधायक कामासाठी राजकारण एक व्यासपीठ आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी जेव्हा महिला दिनानिमित्त गौरव केला होता, तेव्हा पक्षात बोलावले होते. तेथे गेले परंतु, भाजपचे धोरण महिला विरोधी असल्याचे लक्षात येताच दोन आठवड्यात बाहेर पडले. त्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबत दोन वर्षे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.


ट्रान्सजेंडर म्हणून नाही तर महिला म्हणून सन्मान केल्याने काँग्रेसमध्ये आले-


काँग्रेसची निवड का केली असे विचारले असता, अप्सरा रेड्डी म्हणाल्या, एक माहितीपट बनवित असताना काँग्रेस खासदार सुषमा देवी यांच्याशी ओळख झाली. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याची संधी दिली. गांधी यांनी मला एका महिलेप्रमाणे सन्मान देत महिला काँग्रेसचे सरचिटणीस पद देऊ केले. जर ट्रान्सजेंडर अथवा अन्य एखाद्या विभागाचे पद दिले असते तर मी आले नसते. नाही तर आम्हाला सर्वसाधारण महिलांप्रमाणे मान कधी मिळणार ? ट्रान्सजेंडरनी अधिकाधिक प्रमाणात राजकारणात येत विविध पदांवर काम केले पाहिजे. सहानुभूती नको तर शिक्षण, निवारा यामध्ये समान संधी दिली पाहिजे. त्याबरोबरच औषधोपचाराकरिता सरकारतर्फे आर्थिक सवलत मिळाली पाहिजे, असे सांगून रेड्डी म्हणाल्या , आम्हाला पुनर्वसन नको आहे. तर शिक्षणासाठी समान संधी मिळाली पाहिजे. म्हणजे रोजगार मिळवता येईल. तसेच राहण्यासाठी घर हवं आहे. कारण घरच्यांनी बाहेर काढले तर जाणार कोठे? तसेच औषधोपचाराकरिता आर्थिक सवलती दिल्या पाहिजे. मात्र, असे असले तरीही भाजप सरकारने ट्रान्सजेंडरसाठी आणलेल्या विधेयकाला आमचा विरोध आहे. यामध्ये त्यामध्ये ट्रान्सजेंडर एकत्र राहू शकत नसल्याचे म्हटले आहे. तसेच न्यायालयाने दिलेला निवाडा प्रसिद्ध केलेला नाही. मोदी प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधत असतात. त्यांनी आपल्या पत्नीला सोडून दिले. तर आईचे छायाचित्र वापरून राजकारण करतात. त्यामुळे त्यांना महिला सशक्तीकरणावर बोलण्याचा अधिकार नाही.


विद्यमान गोवा सरकारच्या कारभारावर बोलता त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी आहेत. परंतु, भाजप त्यांना फिरवत आहे. त्यांच्या आजारपणाबद्दल सहानुभूती आहे. परंतु, सरकारचा कारभार असमाधानकारक आहे. दरम्यान, चित्रपट अथवा मालिकांच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर होणारी थट्टा थांबविण्यासाठी सेंन्सर बोर्डमध्ये आमचा एक सदस्य असला पाहिजे. संसदेतही जागा मिळाली पाहिजे. कारण देशातील बदलत्या घटना आमच्या जीवनावर परिणाम करत असतात. त्यामुळे आम्हाला सर्वच क्षेत्रात समानसंधी मिळाली पाहिजे, असेही रेड्डी यांनी सांगितले.

Last Updated : Mar 7, 2019, 9:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details