तिरुअनंतपुरम - देशभरामध्ये कोरोनोवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश बंदची घोषणा केली आहे. एकिकडे संपूर्ण देश कोरोना संकटामध्ये आहे. तर दुसरीकडे केरळमध्ये दारू न मिळाल्याने काही मद्यपींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. हे लक्षात घेता, केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन यांनी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तर दारू देण्याचे आदेश दिले आहेत.
डॉक्टरांची चिठ्ठी आणल्यास मद्यपींना मिळणार दारू, राज्य सरकारचा निर्णय - केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तर दारू देण्याचे आदेश दिले आहेत.
![डॉक्टरांची चिठ्ठी आणल्यास मद्यपींना मिळणार दारू, राज्य सरकारचा निर्णय CM Pinarayi Vijayan has directed the Excise Department to provide liquor](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6594221-thumbnail-3x2-agggg.jpg)
केरळमध्ये दारू न मिळाल्यामुळे आतापर्यंत तब्बल 5 जणांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे केरळ सरकारने डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असलेल्या मद्यपींना दारू विक्री करण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. याचबरोबर जी लोक दारूच्या आहारी गेली आहेत. त्यांच्यावर मोफत उपचार करण्याचेही आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
मोदींनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी येत्या 14 एप्रिलपर्यंत म्हणजेच 21 दिवस नागरिकांना जेथे आहे, तेथेच घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण आणण्यासाठी लोकांनी जिथे आहे तिथेच राहणे आणि जनसंपर्क टाळणे आवश्यक आहे. या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता इतर सर्व वस्तूंची दुकानं बंद करण्यात आली आहेत. महामारीमुळे 21 दिवस देश बंद ठेवण्याची ही देशातील पहिली वेळ आहे.