नवी दिल्ली - देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.दररोज कष्ट करून पोट भरणाऱ्या नागरिकांची परिस्थिती तर सर्वात वाईट आहे. त्यापैकी एक म्हणजे मातीची भांडी बनवून त्यांची विक्री करणाऱ्या कुंभार समाजाच्या लोकांपुढे भाकरीचे संकट उभे राहिले आहे.ईटीव्ही भारतने अशाच काही कुटुंबियांसोबत संवाद साधला असून लॉकडाऊनचा त्यांच्या व्यवसायावर काय परिणाम पडला, हे त्यांच्याकडून जाणून घेतले आहे.
लॉकडाऊन इफेक्ट : मातीची भांडी विकणाऱ्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ - लॉकडाऊन इफेक्ट
लॉकडाऊनमुळे नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच हातावर पोट असणाऱ्या कुटुंबियांचे सर्वात जास्त हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील पटपडगंज या भागात मातीची भांडी विक्री करणाऱ्या कुटुंबियांसोबत ईटीव्ही भारतने बातचीत केली आहे.
'घरात अन्न शिजवण्यासाठी पुरेसे धान्य नाही'
नागरिकांची सतत वर्दळ असणारा दिल्लीतील पटपडगंज येथील बाजार सध्या सुनासुना झाला आहे. लॉकडाऊनमुळे येथे येणाऱ्या लोकांचा राबता पुर्णपणे बंद झाला आहे. याबाबत येथील मातीची भांडी विकणाऱ्या महिलांनी त्यांच्या कुटुंबियांपुढे उद्भवलेल्या समस्यांबाबत सांगितले. आर्थिक आवक पुर्णपणे बंद झाल्याने सध्या घरात अन्न शिजवण्यासाठी पुरेसे रेशन देखील नसल्याचे या महिलांनी सांगितले. तसेच शासनाकडून काही प्रमाणात मदत मिळत आहे, परंतु ती पुरेशी नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
या परिस्थितीमुळे काही कुटुंबियांना एकवेळ अन्न खाऊन दिवस काढावे लागत आहे. एका महिलेने, येथे आम्ही मातीची भांडी विकून चांगले पैसे कमवत होतो. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वकाही थांबले असल्याचे सांगितले.