महाराष्ट्र

maharashtra

एल्गार परिषद : चिदंबरम यांच्याकडून वरवरा राव यांच्या सुटकेची मागणी

By

Published : Jul 18, 2020, 2:54 PM IST

एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले तेलगू कवी वरवरा राव यांच्या सुटकेची आणि त्यांच्यासाठी योग्य उपचार व्यवस्था करण्याची मागणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम

नवी दिल्ली -एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले तेलगू कवी वरवरा राव यांच्या सुटकेची आणि त्यांच्यासाठी योग्य उपचार व्यवस्था करण्याची मागणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. वरवरा राव यांच्यासोबत मुंबई पोलीस आणि तळोजा तुरूंगातील अधिकाऱ्यांनी केलेले वर्तन अमानुष असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

वरवरा राव यांची प्रकृती त्यांच्या कुटूंबियांने वर्णन केल्याप्रमाणे चिंतेची बाब आहे. एनएचआरसीच्या देखरेखीखाली राज्य, पोलीस आणि तुरूंगातील अधिकारी असे अमानुष वर्तन करतील, हे विश्वास ठेवण्यापलीकडचे आहे, असे चिदंबरम म्हणाले.

वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तळोजा कारागृहातून उपचारांसाठी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात असलेले 80 वर्षीय वरवरा राव यांची प्रकृती खालावत आहे. या संदर्भात राज्य सरकारने लक्ष देत त्यांना वैद्यकीय चाचण्या व इतर उपचारांसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात यावे, अशी मागणी वरवरा राव यांच्या कुटुंबीयांकडून ऑनलाइन पत्रकार परिषदेत करण्यात आली होती.

एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्यावरून राव आणि इतर 9 सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या खटल्याचा सुरुवातीला पुणे पोलिसांनी तपास केला. मात्र, नंतर याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला होता. 31 डिसेंबर 2017 साली पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भडकाऊ भाषणे दिल्याचा आरोप या नेत्यांवर आहे. या परिषदेनंतर पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details