नवी दिल्ली - भाजप नेते आणि त्यांच्याशी संबंधित काही गट फेसबुकवरून द्वेष आणि तिरस्कारयुक्त मजकूर पसरवत आहेत. मात्र, व्यावसायिक कारणांमुळे फेसबुक अशा नेत्यांवर आणि गटांवर नियमानुसार कारवाई करत नाही, असा आरोप शुक्रवारी अमेरिकेतील 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने आपल्या अहवालात केला आहे. त्यानंतर आज(रविवार) राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर हल्लोबल केला.
'फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर भाजप आणि आरएसएसचे नियंत्रण आहे. या माध्यामातून ते खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवून मतदारांना भडकावत आहेत. शेवटी अमेरिकेतील माध्यामांनी फेसबुकचं सत्य सर्वांसमोर आणलं आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. सोबतच त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमधील वृत्तही शेअर केले आहे.
भारतात लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या धोरणाबद्दल 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने धक्कादायक खुलासा केला आहे. भाजप नेत्यांची फेसबुक खाती आणि सबंधित ग्रुपवरून भारतात द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी माहिती पसरवली जात आहे. मात्र, भारतातील फेसबुकच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होईल, म्हणून कंपनी नियमानुसार कारवाई करण्याचे टाळत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वैयक्तिक खाते असो किंवा कोणताही ग्रुप असो, कडक कारावई करण्यात येत. पर्सनल खाते किंवा ग्रुप फेसबुक कायमचे किंवा अल्पकाळासाठी बंद ही करते. मात्र, कंपनीने भारतात नरमाईचे धोरण अवलंबल्याचा धक्कादायक आरोप या अहवालात आहे. शुक्रवारी हा अहवाल प्रसिद्ध झाला. भाजपचे नेते काही संबंधित गटांवर कारवाई करण्यास फेसबुक कंपनी कचरत असल्याचे अहवालात म्हटले आहे.