महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 22, 2020, 11:39 PM IST

ETV Bharat / bharat

कृत्रिम बुद्धिमत्ता - शेतीतील पुढचा टप्पा!

मानवी विचारांशी संलग्न केली जाऊ शकणारी कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक संज्ञानात्मक प्रक्रिया आहे; मात्र त्याचवेळी ती अधिक नेमकी व अचूक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन निर्णय प्रक्रियेचे स्वयंचलन करणे शक्य आहे. यामुळे, वेगवेगळ्या पातळ्यांवर निर्णय प्रक्रियेचा सहभाग असलेल्या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही तांत्रिक दृष्ट्या अत्यंत कालसुसंगत ठरते. ग्राहकासाठी अन्न सुरक्षेची खात्री आणि शेतकऱ्यांना अर्थ प्राप्तीची सुरक्षा अशी तारेवरची कसरत सुरु असताना भविष्यातील शेतीला चूक परवडणारच नाही. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा भक्कम आधार असलेल्या शेतीचा स्वीकार जगाने मनःपूर्वक सुरु केला आहे. एका व्यावसायिक अहवालानुसार, शेती क्षेत्रामधील कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित घटकाची व्याप्ती २०२५ च्या अखेरपर्यंत १५५ कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

Artificial Intelligence - the next phase in Agriculture
कृत्रिम बुद्धिमत्ता - शेतीतील पुढचा टप्पा!

मानवतेस ज्ञात असलेला शेती हा प्राचीनतम व्यवसाय काळाचे हल्ले सहन करीत सुखदरित्या तगला आहे. अनेक आव्हानांचा सामना करुनही टिकलेल्या आजच्या काळातील शेतीचे स्वरुप हे प्राचीन काळाच्या तुलनेत अधिक शुद्ध व विस्तृत झाले आहे. हवामान बदलापासून ते गुणवत्ता व प्रमाणासाठी सतत वाढत असलेल्या मानवी मागणीपर्यंत; शेतीचे हे क्षेत्र बदलाला सामोरे गेले आहे आणि आश्चर्यकारक तांत्रिक नावीन्याच्या पाठिंब्याच्या जोरावर ठाम व सकसपणे प्रगती करत आहे. उदाहरणार्थ, भारत हा दैनंदिन जीविकेसाठी अन्नाच्या आयातीवर अवलंबून असलेला देश होता. परंतु, आज निव्वळ राष्ट्रीय अन्न सुरक्षेचे नव्हे; तर जागतिक अन्न सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करत आपण अन्न उत्पादनामध्ये आघाडीवर आहोत. हरित क्रांती आणि त्यानंतर झालेल्या तांत्रिक प्रगतीमुळे हरित क्रांतीच्या आधीच्या काळातील किरकोळ ५ कोटी टनापासून ते आज भारताचे अन्न उत्पादन विक्रमी ३० कोटी टन इतके झाले आहे. तेव्हापासून सुधारित बियाणे, पीक व्यवस्था वा पीक सुरक्षा अशा विविध माध्यमामधून भारतीय कृषि क्षेत्राचा तंत्रज्ञान हा एक अविभाज्य घटक बनला आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानामुळे अधिक अचूक, उत्पादक आणि काहीवेळा आभासी झालेली शेतीची संकल्पना ही अधिक प्रगल्भ झाली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये होणारा कृत्रिम बुद्धिमतेचा उदय हा आता आश्चर्यकारक वाटत नाही.

मानवी विचारांशी संलग्न केली जाऊ शकणारी कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक संज्ञानात्मक प्रक्रिया आहे; मात्र त्याचवेळी ती अधिक नेमकी व अचूक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन निर्णय प्रक्रियेचे स्वयंचलन करणे शक्य आहे. यामुळे, वेगवेगळ्या पातळ्यांवर निर्णय प्रक्रियेचा सहभाग असलेल्या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही तांत्रिक दृष्ट्या अत्यंत कालसुसंगत ठरते. ग्राहकासाठी अन्न सुरक्षेची खात्री आणि शेतकऱ्यांना अर्थ प्राप्तीची सुरक्षा अशी तारेवरची कसरत सुरु असताना भविष्यातील शेतीला चूक परवडणारच नाही. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा भक्कम आधार असलेल्या शेतीचा स्वीकार जगाने मनःपूर्वक सुरु केला आहे. एका व्यावसायिक अहवालानुसार, शेती क्षेत्रामधील कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित घटकाची व्याप्ती २०२५ च्या अखेरपर्यंत १५५ कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

शेती क्षेत्रातील जवळजवळ सर्वच पातळ्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होण्यासारखा आहे; मात्र विशेषत: पीकाची निवड, पीकावरील देखरेख आणि भविष्यातील अंदाज (प्रेडिक्शन) वर्तविण्याच्या दृष्टिकोनामधून कृत्रिम बुद्धिमत्ता संवेदनशील आहे. भारतीय शेतीच्या सकल आर्थिक उत्पन्नामध्ये ६०% वाटा हा पावसावर आधारित शेतीचा आहे. या पार्श्वभूमीवर लहरी हवामानाच्या संकटावर उपाय म्हणून आधारभूत योजना असणे अत्यंत आवश्यक आहे. अति ओलसर राहत असलेली माती वा सातत्यपूर्ण कोरड्या हवामानामुळे कदाचित काही वेळा एखाद्या विशिष्ट भागामधील पारंपारिक पीक घेणे शक्य होणार नाही. अशा पार्श्वभूमीवर हवामानाची स्थिती, बियाण्यांची उपलब्धता, स्थानिक प्राधान्य, बाजारमूल्य आणि बाजारामधील मागणी अशा अनेक घटकांचा विचार करता त्या विशिष्ट भागामध्ये एखादे पर्यायी पीक सुचविण्याकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होतो. भूचेतना या प्रकल्पांतर्गत मायक्रोसॉफ्ट या कंपनीने निमशुष्क उष्णकटिबंधीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पीक संशोधन केंद्राबरोबर खरीप मोसमासाठी पेरणीविषयक सल्ला सेवा मर्यादित स्तरावर सुरु केली आहे. या सेवेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ऍपच्या माध्यमामधून सहभागी शेतकऱ्यांना पेरणीच्या सर्वोत्तम दिवशी पेरणीविषयक सूचना पाठविण्यात येते.

याहीपुढे, संपूर्ण पीक देखरेख व माती देखरेखीच्या माध्यमामधून शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचे आणखी एक औत्सुक्यपूर्ण दालन उघडे झाले आहे. पीकवाढीच्या मोसमामध्ये प्रतिमाधारित उपाययोजनेमुळे पीकांच्या स्थितीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. याचमुळे शेतकऱ्यास भविष्यातील धोक्याविरोधात उपाययोजनेसाठी पर्यायही पुरविले जातात. सखोल ज्ञान आणि प्रतिमा प्रक्रियाधारित प्रारुपांमुळे पीकावरील आजार वा कीड ओळखता येऊ शकते. या आजाराचे निदान कशा प्रकारे करता येईल वा त्यास रोखता कशा प्रकारे येईल, यासंदर्भातील शिफारस कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रारूपांच्या साहाय्याने करता येऊ शकेल. प्रतिमा निदान आणि सखोल ज्ञानावर आधारित प्रारुपांच्या मदतीने प्रयोगशाळेतील चाचणी सुविधेशिवायही मातीचे परीक्षण करणे शक्य झाले आहे. उपग्रहांकडून येणाऱ्या संदेशांबरोबर एकत्रित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित योजना; त्याचप्रमाणे शेतजमिनीमध्ये काढण्यात आलेल्या स्थानिक प्रतिमा, यांमुळे मातीचे आरोग्य पुनरुज्जीवित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे शेतकऱ्यांना आता शक्य झाले आहे.

सरकारने २०१८ मध्ये राबविण्यास प्रारंभ केलेले कृषी निर्यात धोरण हे भारतीय शेतकऱ्यांची व्यावसायिक व्याप्ती वाढविणारे एका महत्त्वपूर्ण पाउल होते. मात्र याचबरोबर, या धोरणाची परिणती प्रतवारी ठरविण्यासाठी भारतामधील उत्पादन विषयक व्यवस्थेमध्ये मानके ठरविण्यातही झाली. कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित प्रारूपांच्या सहाय्याने कृषी उत्पादनांच्या खात्रीलायक आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जागतिक कृषी मानक व्यवस्थेची निर्मिती करता येईल. रंग, वजन वा आकार अशा विविध स्तरावरील विविधता असणाऱ्या फळे, धान्य, भाज्या, कापूस यांसारख्या ताज्या उत्पादनांच्या प्रतवारीसाठी अन्न उत्पादनांच्या प्रतिमेचे स्वयंचलित गुणवत्ता परीक्षण ही विश्वासार्ह व अचूक पद्धत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान हे शेतकऱ्याने त्याच्या फोनवर घेतलेल्या प्रतिमेचे वाचन करते आणि कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय तत्काळ या उत्पादनाची गुणवत्ता ठरवते.

शेतीतील अंदाजावर आधारित विश्लेषण या क्षेत्रासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होउ शकतो. किंमतीच्या अंदाजाच्या माध्यमामधून छोट्या शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तोडगा सुचवून त्यायोगे त्यांना सक्षम बनविण्यासाठी कर्नाटक सरकारने मायक्रोसॉफ्ट कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत मायक्रोसॉफ्ट कर्नाटक कृषी मुल्य आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पेरणी क्षेत्र, उत्पादनाचा कालावधी, हवामानविषयक माहिती आणि इतर संबंधित माहिती संच विचारात घेउन कृषी उत्पादन किंमतीचे एक बहुविध अंदाजविषयक प्रारूप विकसित करण्यासाठी डिजिटल साधने वापरणार आहे. भारतातील कृषीरसायनांची सर्वांत मोठी उत्पादक कंपनी असलेल्या युनायटेड फॉस्फरसबरोबरही मायक्रोसॉफ्टने केलेल्या व्यावसायिक भागीदारीमधून किडीच्या हल्ल्याच्या धोक्याची आगाउ सूचना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र ज्ञानाच्या सहाय्याने एक ऍप (किडीच्या हल्ल्याच्या भविष्यकालीन अंदाजासाठी) तयार करण्यात येणार आहे. 'कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी राष्ट्रीय धोरण' या जून २०१८ मधील अहवालाच्या माध्यमामधून खुद्द नीती आयोगाने सर्वांत वेगवान अर्थव्यवस्था असलेल्या व सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत जगातील दुसराच देश असलेल्या भारतासारख्या देशामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात आघाडीवर असलेल्या देशांबरोबर भारतास प्रस्थापित करण्यासाठी नीती आयोगाकडून पाच क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. या क्षेत्रांमध्ये अर्थातच कृषी क्षेत्र हे अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून उदयास आले आहे.

भारतामधील शेती म्हणजे पारंपारिक शहाणपण, शेतीविषयक रूढ पद्धती, धोरणात्मक हस्तक्षेप आणि काहीशी अनिश्चितता या सगळ्यांचा परिपाक आहे. हवामान, राजकारण, आंतरराष्ट्रीय परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती यांमुळे आधीच आव्हानात्मक असलेल्या या कृषी क्षेत्राच्या अडचणींत वाढ होते. शेतीस प्रभावित करणाऱ्या अनेकविध कारणांचा विचार करता निर्णयप्रक्रिया अधिक अचूक करण्यासाठी आणि काही वेळा नुकसान टाळण्यासाठी आगाउ माहिती पुरविण्याकरताही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो आहे. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे एका नवा टप्पा सुरु होईल. सुरुवातीला, या तंत्रज्ञानाचा नेमकेपणा कदाचित थोडासा आव्हानात्मक ठरू शकेल; मात्र अखेरीस मागणी व पुरवठ्यासंदर्भातील हे गणित आपण निश्चितच सोडवू शकू.

- डॉ. एम जे खान (अध्यक्ष, इंडियन चेम्बर ऑफ फूड अँड एग्रिकल्चर)

ABOUT THE AUTHOR

...view details