महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतरही अणसूले ग्रासस्थांचा मतदानावर बहिष्कार कायम

एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येथे तर २०० मतदार आहेत.

By

Published : Apr 20, 2019, 3:16 PM IST

Updated : Apr 20, 2019, 4:15 PM IST

अणसूले ग्रासस्थांची बैठक

पणजी- उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील अणसूले गाव गोवा मुक्तीपासून आजही बारमाही रस्त्यापासून वंचित आहे. रस्ता होत नाही, तोपर्यंत मतदान नाही, अशी ग्रामस्थांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना समजविण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आज गावाला भेट दिली. परंतु, रस्ता होईपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

सत्तरी तालुक्यातील पर्ये मतदारसंघातील हे गाव नव्याने विकसित होणाऱ्या वाळपई शहराच्या हद्दीपासून हाकेच्या अंतरावर आहे. परंतु, बारमाही वाहतूक सुविधा नसल्याने वृद्ध, महिला, मुले यांना ते फारच त्रासदायक ठरते. गोवा सरकारने मुलांची शाळेत ने-आण करण्यासाठी सुरू केलेला 'बालरथ' गावात येत नाही. त्यामुळे मुलांची पायपीट आजही कायम आहे. त्यामुळे गावापर्यंत रस्ता होत नाही, तोपर्यंत मतदान करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घोषित केला होता. त्याची दखल घेत उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी आज अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपाळ पार्सेकर आणि मामलेदार यांच्यासह अणसूले ग्रामस्थांची भेट घेत त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच गावची रस्त्याची समस्या आचारसंहिता संपताच सोडविली जाईल, असेही आश्वासन दिले. मात्र, ग्रामस्थ रस्ता होत नाही तोपर्यंत मतदान न करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर जिल्हाधिकारी आर. मेनका आपल्या भेटीविषयी बोलताना म्हणाल्या, माध्यमांतून आणि अंतर्गत माहितीच्या आधारे माहिती मिळाली होती की, पर्ये मतदारसंघातील ३५ क्रमांकाच्या मतदान केंद्रातील लोकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार यांना प्राथमिक माहिती घेण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यांनी गुरुवारी माहिती दिल्यानंतर आम्ही आज येथे आलो आहे. कारण एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येथे तर २०० मतदार आहेत. येथील रस्ता प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आचारसंहिता लागू असल्यामुळे ती संपताच मे अखेरपर्यंत रस्ता करून दिला जाईल. यासाठी प्रत्यक्ष लक्ष घालण्यात येईल.

यावेळी लोकांनी आपल्याला वारंवार आश्वासने देऊन कशा प्रकारे फसविले जाते. रुग्ण आणि शाळकरी मुले यांची कशाप्रकारे फरफट होते, याचे अनुभव कथन केले. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतरही ग्रामस्थ रस्ता होत नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

Last Updated : Apr 20, 2019, 4:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details