महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एक्झिट पोल जाहीर होताच राजभर यांना कॅबिनेटवरून हटवले, मुख्यमंत्री योगींच्या शिफारशीनंतर तडकाफडकी निर्णय - cabinet minister op rajbhar

'मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला निर्णय घेतला. गरिबांचा आवाज उठवण्याची त्यांच्या वरील अन्यायाला वाचा फोडण्याची ही शिक्षा मिळाली आहे. हक्क मागणे ही जर बंडखोरी असेल, विद्रोह असेल तर, आम्ही बंडखोर आहोत, असे समजा,' अशी तिखट प्रतिक्रिया राजभर यांनी नोंदवली आहे.

योगी आदित्यनाथ, ओम प्रकाश राजभर

By

Published : May 20, 2019, 1:50 PM IST

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शिफारशीनंतर राज्यपाल राम नाईक यांनी ओम प्रकाश राजभर यांना कॅबिनेट मंत्री पदावरून हटवले. राजभर यांच्याकडे मागासवर्गीय कल्याण आणि अपंग जन विकास मंत्रालय होते. लोकसभा निवडणूकीच्या एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपने राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षसोबतची युती तोडली आहे.

रविवारी आलेल्या बहुतांशी एक्झिट पोलच्या निकालात एनडीएला भरघोस जागा मिळतील, असे चित्र समोर आले. यानंतर राजभर यांना तडकाफडकी कॅबिनेटमधून हटविण्यात आले. मागील वर्षापासून राजभर यांनी योगींना वारंवार लक्ष्य केले होते. त्यांनी योगींवर युतीतील पक्ष आणि मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर एप्रिलमध्ये नाट्यमयरीत्या ते योगींच्या लखनौ येथील घरी पहाटे ३ वाजता जाऊन पोहोचले होते. त्यांनी राजीनाम्याचे पत्र देत असल्याचे सांगत मुख्यमंत्री योगींची भेट मागितली होती. मात्र, मुख्यमंत्री झोप घेत असल्याचे सांगितल्यानंतर ते निघून गेले. यानंतर पक्षाने त्यांची समजूत घालत त्यांना युती तोडण्यापासून थांबवले होते.

कॅबिनेट मंत्री पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर राजभर यांनी योगी आदित्यनाथ आणि भाजपविरोधात तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे. 'आम्ही या निर्णयाचे स्वागत करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला निर्णय घेतला. गरिबांचा आवाज उठवण्याची त्यांच्या वरील अन्यायाला वाचा फोडण्याची ही शिक्षा मिळाली आहे. हक्क मागणे ही जर बंडखोरी असेल, विद्रोह असेल तर, आम्ही बंडखोर आहोत, असे समजा. त्यांनी सामाजिक न्याय समिती स्थापन केली आणि त्यांनी दिलेला अहवालाची अंमलबजावणी करण्याची तसदी न घेता तो कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. आजचा निर्णय घेण्यात त्यांनी जी तत्परता दाखविली, तितकीच तत्परता समितीचा अहवाल लागू करण्यातही दाखवावी, असे त्यांनी म्हटले आहे.

सुभासप उत्तरप्रदेशात भाजपसह युती सरकारमध्ये आहे. त्यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी ४ जागा जिंकल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणूकीवेळी त्यांनी भाजपशी युती केली नाही. राजभर यांनी स्वतःच्या पक्षाचे ३९ उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. तसेच, काही जागांवर त्यांनी भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला होता. नुकतेच, राजभर यांचे पुत्र आणि सुभासपचे महासचिव अरूण राजभर यांनी 'भाजपसह विधानसभा निवडणुकीसाठी युती केली होती, लोकसभा निवडणुकीसाठी नाही,' असे जाहीररीत्या म्हटले होते.

भाजप सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील ३ जागा सोडल्या तर, इतर सर्व जागांवर एक ते तीन लाखांच्या फरकाने निवडणूक हरेल, असे त्यांनी म्हटले होते. तसेच, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलतात,' असेही राजभर यांनी म्हटले होते. 'सध्या ते स्वतःला मागासवर्गीय म्हणत आहेत. आधी तर ते स्वतःला पुढारलेल्या समाजातील म्हणवत असत,' असे ते म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details