नवी दिल्ली - स्थलांतरीत कामगारांना वेतन मिळावे यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मानवाधिकार कार्यकर्ते हर्ष मंदार आणि अंजली भारद्वाज यांनी ही याचिका दाखल केली असून, संघटीत, असंघटीत किंवा इतर कोणत्याही स्थलांतरीत कामगारांना वेतन देण्यात यावे. तसेच त्यांना भत्ताही देण्यात यावा, असा उल्लेख याचिकेत केला आहे. बुधवारी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ही याचिका न्यायाधीश एल नागेश्वर राव यांच्यासमोर टेलीफोनच्या माध्यमातून मांडली.
दिल्ली, पुणे, मुंबई आणि इतर मेट्रो शहरांमधून उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि इतरही राज्यामध्ये आपल्या मूळ गावी कोरोनाच्या भीतीने कामगारांचे लोंढे जात आहेत. या पार्श्वभूमीवर तसेच जे कामगार घरातच अडकून पडले आहेत. अशांना मदत मिळावी म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली आहे.