गोपालगंज(बिहार) - येथील हरखुआ गावातील धनंजय शर्मा यांचे कुटुंब गेल्या चार दिवसांपासून उपाशी आहे. मात्र, अद्यापही कोणीच त्यांना मदत केली नाही. काहीच पर्याय नसल्याने सातवीतील विद्यार्थ्याने कुटुंबीयांची भूक भागवण्यासाठी मजुरी केली. मात्र, मजुरीतून मिळालेले पैशातून त्याला कर्ज फेडावे लागले.
गुजरातमध्ये शिवणकाम करणाऱ्या धनंजय शर्माचे कुटुंब उपाशी आहे. हे बघून घरातील मोठा मुलगा कृष्णा शर्मा याने आश्रय शिबीरात काम करून पैसे मिळवले. ईटीव्ही भारतशी बोलताना कृष्णाने सांगितले, की तो सातवीचा विद्यार्थी आहे. वडील गुजरातमध्ये अडकले असून त्यांचे काम बंद आहे. त्यामुळे मजुरी करावी लागत आहे.