नवी दिल्ली - 'अम्फान' चक्रीवादळाचे रुपांतर 'सुपर सायक्लोन'मध्ये झालं असून आज हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या वादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांना बसणार आहे. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सायक्लोन(वादळ) म्हणजे काय?
कमी हवेचा दाब असलेल्या पट्ट्याकडे जास्त दाब असलेल्या प्रदेशाकडून वेगाने वारे वाहिल्याने वादळ तयार होते. विषुवृत्ताच्या उत्तरेकडे कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे आकर्षित होतात. हे वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. त्यामुळे तेथे वादळ निर्माण होते. याचप्रमाणे विषुवृत्ताच्या दक्षिणेकडे ही वादळे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार फिरतात.
विषुववृत्तीय प्रदेश सोडता पृथ्वीच्या सर्वच भागात वादळं तयार होतात. काहींची तीव्रता जास्त असते तर काही सौम्य स्वरूपाची असून नष्ट होतात. काही वादळे 200 ते 300 किमी प्रतितास या वेगानेही वाहतात. हे वादळ समुद्र किनाऱ्यावर वेगाने धडकल्याने विध्वंस होतो. बंगालच्या उपसागरात तयार झालेले अम्फान वादळ 20 तारखेला भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशाचा किनारी भाग आणि आजूबाजूच्या किनारी प्रदेशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.