नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे देशभरामध्ये 21 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, ही संचारबंदी 49 दिवसांपर्यंत वाढवावी लागेल, असा दावा इंग्लडमधील भारतीय वंशाच्या दोन संशोधकांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी एका गणितीय प्रमाणपद्धतीची मांडणी केली आहे. जर 49 दिवस संपूर्ण देशभर संचारबंदी लागू केली नाही, तर ठराविक काळाची सूट देत दोन महिन्यांपर्यंत लॉकडाऊन ठेवावा लागले, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. दोघेही इंग्लडमधील केंब्रिज विद्यापीठात संशोधक म्हणून कार्यरत आहेत.
रनजॉय अधिकारी आणि राजेश सिंग या दोन संशोधकांनी यासंबधी शोधप्रबंध सादर केला आहे. डिपार्टमेंट ऑफ एप्लाईड मॅथिमॅटिक्स आणि थिऑरोटिकल फिजिक्स विभागात ते संशोधन करत आहेत. 21 दिवसांची संचारबंदी परिणामकारक ठरणार नसून पुन्हा कोरोनाचे रुग्ण भारतात वाढणार असल्याचा निष्कर्ष त्यांनी अभ्यासातून काढला आहे.