नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील राणी झांसी रोडवरील अनाज मंडी येथील फॅक्ट्रीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. आगीनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून तब्बल 50 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या आगीत 43 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी इमारतीचा मालक रेहान याला अटक केली आहे. तसेच मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील अनाज मंडीमध्ये भीषण आग, 43 जणांचा होरपळून मृत्यू
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मृताच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी 10 लाखांची नुकसान भरपाई तर जखमींना प्रत्येकी 1 लाख आणि मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर भाजप मृताच्या कुटुंबीयांना 5 लाखांची नुकसान भरपाई तर जखमींना 25 हजार रुपये देणार आहे.
आगीमध्ये जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ) प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये पंतप्रधानांनी मंजूर केले आहेत.
इमारतीच्या मालकाविरोधात कलम 304 अतंर्गत खटला दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका भारद्वाज यांनी दिली. दरम्यान हे प्रकरण क्राईम ब्रँचला सोपविण्यात आले आहे.
सकाळी 5: 30 ला आग लागल्याची महिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे अग्निशमन अधिकारी सुनील चौधरी यांनी सांगितले. बचावकार्य सुरू असताना काही ठिकाणी प्लास्टिकचे काम सुरू होते. त्यामुळे आगीने वेगाने पेट घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आगीत भाजलेल्यांना सफदरजंग आणि एलएनजेपी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आग इतकी भीषण होती की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळावर होत्या.
अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आगीच्या धुरामुळे गुदमरून काही जणांचा मृत्यू झाला असून मृत पावलेल्यामध्ये बिहार आणि उत्तरप्रदेशमधील काही कामगार असल्याची माहिती आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांनी टि्वट करून दुख: व्यक्त केले आहे.
भाजप नेता विजेंद्र गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेमध्ये विशेष सत्र भरवण्याची मागणी केली आहे. तर भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी दु:ख व्यक्त केले असून कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
दिल्ली सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून येत्या 7 दिवसांच्या आत अहवाल मागितला असल्याची माहिती कैलाश गहलोत यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पूरी यांनी या प्रकरणाचे राजकारण करू नये असे म्हटले आहे.