कोल्हापूर: खराब हवामानामुळे मिशन एव्हरेस्ट मोहिमेत मोठा अडथळा निर्माण होत आहे. 26 ते 28 मे ही वेदर विंडो (अनुकूल वातावरणाची) चढाईसाठी पूरक होते. मात्र, आता यास चक्रीवादळामुळे इथल्या हवामानात मोठा बदल झाला आहे. वेगाने वाहणारे वारे आणि बर्फवृष्टीमुळे कोल्हापुरची कन्या कस्तुरी सावेकर तिसऱ्या कॅम्प वरून दुसऱ्या कॅम्प वर परतली आहे. त्यामुळे तिच्यासोबत असलेले अन्य गिर्यारोहक सुद्धा आता अनुकूल वातावरणाच्या प्रतीक्षेत आहेत.
कॅम्प दोन वर सुद्धा आता प्रचंड वारा; बर्फवृष्टी; टेन्टसह कपडेही झाले ओले
मिळालेल्या माहितीनुसार, बेसकॅम्प दोन वर सुद्धा आता प्रचंड बर्फवृष्टी, पाऊस तसेच प्रचंड वारा वहात आहे. सध्याची परिस्थिती फारच बिकट झाली असून 50 फूटाच्या पुढचे काहीही दिसत नाहीये. सर्वांचेच टेन्ट ओले झाले आहेत तर कपडेही ओले झाले आहेत. कपडे वाळण्यासाठी कोणताही पर्याय नाहीये. एव्हढेच नाही तर खाण्याचे साहित्य सुद्धा संपत आले आहे. बर्फवृष्टीमुळे बेसकॅम्प वरून खाण्याचे साहित्य वर येऊ शकत नाहीये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकवेळा हेलिकॉप्टर द्वारे ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा मागविण्यात आले आहे. खरंतर एव्हरेस्ट मोहीम ही नेहमीच हवामानावर अवलंबून राहिली आहे. बहुतांश मोहिमांमध्ये अशाच पद्धतीने अडथळे निर्माण होत असतात. मात्र 'यास' वादळाच्या प्रभावामुळे इथले वातावरण खूपच बिघडले असल्याची माहिती मिळाली आहे. अशा या बिकट परिस्थितीत कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिच्यासह अन्य गिर्यारोहक वेदर विंडो (अनुकूल वातावरणाची) मिळेल अशी आशा बाळगुन हिम्मत न हारता चढाईची वाट पहात आहेत.