जयपूर :आपल्या चार चिमुकल्यांना घेऊन स्वतःचा कथित प्रियकर सचिन मीनासाठी पाकिस्तानची सीमा ओलांडून भारत गाठणारी सीमा हैदर गेले काही दिवस चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यानंतर राजस्थानच्या अंजूने आपल्या फेसबुकवर भेटलेल्या कथित प्रियकरासाठी पाकिस्तान गाठल्याने नव्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. अंजूने फेसबुकवर भेटलेल्या कथित प्रियकरासाठी 21 जुलैला भारत-पाकिस्तान सीमारेषा ओलांडल्याचे तिने घेतलेल्या फोटोवरुन स्पष्ट झाले आहे. अंजू 20 ऑगस्टला भारतात परत येणार असल्याची माहिती तिच्या कथित प्रियकराने दिली आहे. दरम्यान अंजूसोबत आपण लग्न करणार नसल्याचे अंजूच्या कथित प्रियकर नसरुल्लाह याने स्पष्ट केले आहे.
कथित फेसबुक प्रियकराने फेटाळला लग्नाचा दावा :राजस्थानातील अलवर येथील अंजू आपल्या फेसबुकवर भेटलेल्या कथित प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेली आहे. मात्र अंजू 20 ऑगस्टला तिचा व्हिसा संपल्यावर भारतात परतणार असल्याची माहिती तिचा कथित प्रियकर नसरुल्ला याने दिली आहे. त्यांच्या दोघातील प्रेमसंबंध नसरुल्लाने फेटाळून लावले आहे. अंजूसोबत लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचेही नसरुल्लाहने यावेळी स्पष्ट केले. नसरुल्लाह आणि अंजूची फेसबुकवर 2009 मध्ये मैत्री झाली होती.
अंजू पोहोचली पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा भागात :राजस्थानमधील खरगपुरा गावातील शिवनाथ कुटुंबासह भिवडी येथे राहतात. ते तिथे खासगी काम करतात. त्यांना अरविंद कुमार (40), अनूप (35) आणि अभिषेक (30) अशी तीन मुले आहेत. पैकी थोरल्या अरविंद कुमार याचे 2007 मध्ये मध्य प्रदेशातील गुना येथील रहिवासी असलेल्या अंजूशी लग्न झाले होते. अरविंद डेटा एन्ट्रीचे काम करताे. अंजूही तापुकरा येथील एका कंपनीत काम करते. अंजू आणि अरविंद यांना दोन मुले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अंजूची पाकिस्तानच्या नसरुल्लासोबत मैत्री झाली. यानंतर अंजू त्याच्या प्रेमात पडल्याने ती पती आणि दोन मुलांना सोडून कथित प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे पोहोचली.